….तरच काँग्रेससोबत जाणार : प्रकाश आंबेडकर

| Updated on: Jul 15, 2019 | 5:47 PM

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसला 40 जागांची ऑफर दिली आहे. ती स्वीकारली तरच  काँग्रेससोबत जाऊ असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

....तरच काँग्रेससोबत जाणार : प्रकाश आंबेडकर
Follow us on

मुंबई :  येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसला 40 जागांची ऑफर दिली आहे. ती स्वीकारली तरच  काँग्रेससोबत जाऊ असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. तसंच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं.

आम्ही आधीच आमची भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस काही भागात तुल्यबळ नाही. माझी असदुद्दीन ओवेसींसोबत बैठक झाली. आमची आघाडी पुढे कायम ठेवण्याचं आमचं ठरलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

एमआयएमची 100 जागांची मागणी आमच्याकडे पोहोचली नाही, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी

निवडणूक आयोग, मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी ईव्हीएम हॅक होणार नाही असा दावा केला. हायकोर्टाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठत EVM विरोधात 31 याचिका दाखल आहेत.  कोर्टाने निवडणूक आयोगाला मतदानाच्या आकडेवारीत फरक कसा झाला याबाबत विचारणा करावी, असं आंबेडकर म्हणाले.

ईव्हीएममधील फरक कसा आला हे सांगितलं पाहिजे. राज्यात 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानात फरक दिसला. हे सर्व रिटर्निंग ऑफिसने ही माहिती आयोगाला कळवली नाही. जर या अधिकाऱ्यांनी काही अधिकार नाहीत, तर मग त्यांनी निकाल जाहीर करणं अयोग्य आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.

आम्ही ईव्हीएम बाबत जनआंदोलन सुरूच ठेऊ. 48 मतदार संघातील फरक आम्ही समोर आणला आहे. कोर्टाने आता यावर उत्तर द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसंच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या अशी मागणीही त्यांनी केली.

काँग्रेसला साप चावला का?

काँग्रेस हा आम्हला भाजपची बी टीम म्हणत होता. पण आता त्यांना ईडी आणि सीबीआयचा साप चावला का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला.

भाजपची राज्यसभेची ऑफर खोटी

भाजप मला राज्यसभा देणार हे बोललं जात होतं, मात्र त्यात काही तथ्य नाही. मी सत्तेचा भुकेला नाही. इतके वर्षे मी जनाधार जमवला आहे, ही माझी सत्ता आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सरकार पाडण्याची काँग्रेसची परंपरा

सरकार पडण्याची परंपरा ही काँग्रेसच्या काळातही होती. आता भाजप करत आहे. यात नवीन काही नाही. मला वाटतं भाजप जरा सावकाश पावलं उचलत आहे.