पावसाळी अधिवेशनात वंचित बहुजन आघाडीचा विधानभवनावर मोर्चा धडकणार, नेमक्या मागण्या काय?

| Updated on: Jun 30, 2021 | 8:55 PM

धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगल घडवणाऱ्यां विरुद्ध कायदा व 5 टक्के मुस्लिम आरक्षण त्वरित लागू करावे या मागणीसाठी ५ जुलै रोजी आमचा मोर्चा विधानभवनावर धडकेल, असा इशारा आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

पावसाळी अधिवेशनात वंचित बहुजन आघाडीचा विधानभवनावर मोर्चा धडकणार, नेमक्या मागण्या काय?
प्रकाश आंबेडकर
Follow us on

मुंबई : पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला कोंडित पकडण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारला इशारा दिलाय. धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगल घडवणाऱ्यां विरुद्ध कायदा व 5 टक्के मुस्लिम आरक्षण त्वरित लागू करावे या मागणीसाठी ५ जुलै रोजी आमचा मोर्चा विधानभवनावर धडकेल, असा इशारा आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन अधिक तापण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. (Prakash Ambedkar warns Mahavikas Aghadi government)

“धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगल घडवणाऱ्यां विरुद्ध कायदा व 5 टक्के मुस्लिम आरक्षण त्वरित लागू करावे या मागणीसाठी ५ जुलै रोजी आमचा मोर्चा विधानभवनावर धडकेल. आमचा निर्धार पक्का आहे. सरकारला वाटत असेल मोर्चा निघू नये तर त्यांनी आमच्या ह्या रास्त मागण्या मान्य कराव्या. मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मंजूर झाले होते. मराठा आरक्षणाबरोबर त्यालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले, परंतु न्यायालयांनी मुस्लिम आरक्षण मान्य केले आहे. असे असूनही तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिम समाजाला वंचित ठेवले ही शरमेची बाब आहे”, असं ट्वीट करुन आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपचीही रणनिती ठरली

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला कोण-कोणत्या विषयांवर कोंडित पकडायचं, या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचं कळतंय. शेतकरी, कोरोना ते आरक्षण अशा सर्व विषयांना न्याय देण्याबाबत आम्ही रणनिती ठरवल्याचं या बैठकीनंतर आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं.

राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहे. संपूर्ण अधिवेशन झालं असतं तर सर्व विषयांना न्याय देता आला असता. पण सरकारनं यापेक्षा अजून छोटं अधिवेशन ठेवता येत नाही की काय म्हणून दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे, असा टोला शेलार यांनी लगावलाय. त्याचबरोबर अधिवेशनाच्या दोन दिवसांत शेतकरी, कोरोना ते आरक्षण या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याचं काम आम्ही करु, असं शेलार म्हणाले. त्यामुळे दोन दिवसाच्या अधिवेशनातही सरकारला कोंडित पकडण्याची रणनिती भाजपनं आखल्याचं दिसून येत आहे.

संबंधित बातम्या :

‘मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही, जी जबाबदारी देतील ते पार पाडेन’, नाना पटोलेंकडून स्पष्ट

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमतापेक्षा जास्त मताने जिंकू, मलिकांचा दावा, राज्यपाल कोश्यारींना टोला

Prakash Ambedkar warns Mahavikas Aghadi government