Uddhav Thackeray | शिवसेना वाचवण्यासाठी ठाकरेंची धडपड, मीरा भाईंदरच्या संपर्कप्रमुख पदावरून प्रताप सरनाईकांना काढलं, पुढची रणनीती काय?

महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मोठा धक्का बसलाय. पाहता पाहता शिवसेनेतील दिग्गज नेते शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय.

Uddhav Thackeray | शिवसेना वाचवण्यासाठी ठाकरेंची धडपड, मीरा भाईंदरच्या संपर्कप्रमुख पदावरून प्रताप सरनाईकांना काढलं, पुढची रणनीती काय?
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 11:25 AM

मुंबईः एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईसह राज्यभरातील शहरं आणि ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर राज्यात शिवसेना टिकवण्याचं आव्हान आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता शिवसेना पक्ष (Shivsena Party) संघटन वाढवण्यासाठी अत्यंत जलदगतीने पावलं उचलत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक पालिकांमधील नगरसेवक शिंदे गटात जात असल्याने शिवसेना खबरदारीने पावलं उचलत आहे. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर क्षेत्राच्या प्रभारी संपर्कप्रमुखपद प्रताप सरनाईक यांच्याकडे होते. सरनाईक हे आता शिंदे गटात गेल्याने या जागेवर आता विनोद घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घोसाळकर हे आधी शिवसेना उपनेते आणि औरंगाबाद, जालना जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी होते. आता ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची महापालिका वाचवण्यासाठी घोसाळकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

बंडखोरांना घरचा रस्ता, विश्वासूंना संधी

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणचे शिवसेना नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे अत्यंत विश्वासू नेतेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. यातील काहींच्या पक्षविरोधी कारवाया हेरून उद्धव ठाकरेंनी त्यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. याअंतर्गतच विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तर ठाकरे यांच्याच आदेशाने अर्जुन खोतकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेने एका पत्रकाद्वारे ही माहिती जारी केली. अशा प्रकारे एकामागून एक बंडखोरांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर शिवसेना पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. आता नव्या चेहऱ्यांना शिवसेना पक्षात संधी मिळेल.

शिवसेनेची पक्ष विस्ताराची रणनीती काय?

महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मोठा धक्का बसलाय. पाहता पाहता शिवसेनेतील दिग्गज नेते शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांच्या गाठी-भेठी घेतल्या जात आहेत. ठिकठिकाणी शिवसेनेचे मेळावे आयोजित केले जात आहे. राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांवर बंडखोरांचं वर्चस्व राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. तसेच तळागाळातील कार्यकर्ता सोबत रहावं, यासाठी प्रयत्न होत आहेत. आदित्य ठाकरेंनी सुरु केलेली निष्ठा यात्रा याचाच भाग आहे.