Cabinet Expansion: अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या कामांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज?, अनेकांची उचलबांगडी होणार, लवकरच मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रालाही संधी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, राज्यात एकनाथ शिंदे यांचे भाजपासोबत सरकार स्थापन झालेले आहे. शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचा गटही शिंदे यांनी फोडला आहे. राज्यात मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर केंद्रातही या गटाला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

Cabinet Expansion: अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या कामांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज?, अनेकांची उचलबांगडी होणार, लवकरच मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रालाही संधी
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
Image Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 6:06 PM

नवी दिल्ली – लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा (cabinet ministers expansion) विस्तार होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमध्ये सध्या असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या कामाची समीक्षा करण्यात येते आहे. ज्यांचे प्रगतीपुस्तक खराब आहे, अशा मंत्र्यांची उचलबांगडी करण्यात येणार येईल, अशी माहिती आहे. पक्षनेतृत्व (PM Modi)अनेक मंत्र्यांच्या कामावर असमाधानी असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या कामांना मंत्रालयाने जमिनीवर, अखेरच्या घटकापर्यंत किती नेले आहे, याची तपासणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटाचे दोन खासदारही केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येतील, अशीही शक्यता आहे. केंद्र सरकारमधील सध्याच्या एक डझन म्हमजे 12 मंत्र्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांचे मंत्रालयही बदलले जाणार असल्याचे सांगण्यात येते आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातून शिंदे गटातील दोन मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, राज्यात एकनाथ शिंदे यांचे भाजपासोबत सरकार स्थापन झालेले आहे. शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचा गटही शिंदे यांनी फोडला आहे. राज्यात मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर केंद्रातही या गटाला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे आणि प्रतापराव जाधव या दोन खासदारांच्या नावांची चर्चा सध्या शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी सुरु आहे.

गेल्या वर्षी झाला होता मंत्रिमंडळ विस्तार

गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंळ विस्तार केला होता. 2019 मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर केलेला हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होता. यात 43 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल यांच्यासह 36 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. तर उर्वरित सात हे आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे हवाई वाहतूक मंत्रालय तर मनसुख मंडाविया यांना आरोग्य मंत्रालय देण्यात आले होते. रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर आणि डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात आले होते.

नुकताच दोन मंत्र्यांचा राजीनामा

राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपल्यामुळे नुकतेच दोन मंत्र्यांची त्यांच्या पदांचे राजीनामे दिलेले आहेत. त्यात मुख्तार अब्बास नक्वी आणि जेडीयूच्या आरसीपी सिंह यांचा समावेश आहे. या दोघांच्या मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार हा स्मृती इराणी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणूकीची तयारी

या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आगामी काळआत ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत, त्यातील काही नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा निवडणुकांसाठीही ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे, किंवा ज्या ठिकाणी गरज आहे, त्या भागातील खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.