राज्यात पुन्हा मोठा भूकंप होणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सर्वात मोठा दावा

| Updated on: Jul 10, 2023 | 6:38 AM

मुख्यमंत्रीपदावर अजित पवार विराजमान होतील याबाबत मला दिल्लीतून मिळालेल्या राजकीय विश्लेषणातून ही माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्रीपद रिक्त झाल्यास त्यांना मराठा चेहरा हवा आहे.

राज्यात पुन्हा मोठा भूकंप होणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सर्वात मोठा दावा
prithviraj chavan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सातारा : आधी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून सवतासुभा मांडल्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. गेल्या महिना दोन महिन्यात राज्याच्या राजकारणात हे दोन मोठे भूकंप झालेले असतानाच आता तिसरा भूकंपही होणार असल्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीच हा दावा केला आहे. मीडियाशी संवाद साधताना चव्हाण यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात आता कोणता नवीन भूकंप होणार याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

36 पेक्षा जास्त आमदार जर दुसऱ्या गटात आहेत हे सिद्ध झाल्यास अजितदादाच्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हाव लागेल. तसं झालं तरच त्यांचं निलंबन रद्द होईल असं कायदा सांगतो. आतापर्यंत फुटीर गटाकडे 36 आमदारही दिसत नाहीत. काही आमदार अटी टाकून त्यांच्याकडे येत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्र्यांचं निलंबन केलंय. मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहे? असा सवाल करतानाच हा संपूर्ण पक्षपातीपणा आहे. अजितदादा गटाकडे 36 आमदारांचं संख्याबळ झालं नाहीत तर पुन्हा मोठा भूकंप होणार आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

मोदीच जबाबदार

हा फक्त राष्ट्रवादीचा प्रश्न नाहीये. तर हा राज्याचा प्रश्न आहे. राज्यात वैध सरकार आहे की अवैध सरकार आहे हे यावरून ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षांना शिवसेना निलंबनाबाबत 10 ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे. आधी खोक्याची भाषा वापरली आता मंत्रीपदाची भाषा आहे. राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचचं लक्ष नाही. या सगळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. सत्तेत राहण्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता साथ देत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

कर्नाटकाची पुनरावृत्ती होणार

70 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असेल तर मग कारवाई का केली नाही? ती त्यांची जबाबदारी होती. पक्षाचं नावं घेऊन आरोप करत असाल तर सखोल चौकशी झाली पाहिजे. कर्नाटकाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी तुटल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला सामोरे जाता येणार नाही हे भाजपंला माहीत आहे, असंही ते म्हणाले.