फडणवीसांनी आता ‘या’ दोन आकडेवाऱ्या द्याव्यात, पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन

| Updated on: May 27, 2020 | 7:56 AM

महाराष्ट्राच्या वाट्याला त्या दोन लाखापैकी जास्तीत जास्त 20 हजार कोटी रुपये येऊ शकतात" असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. (Prithviraj Chavan on Devendra Fadnavis)

फडणवीसांनी आता या दोन आकडेवाऱ्या द्याव्यात, पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन
Follow us on

कराड, सातारा : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या वतीने किती कर्ज आणि किती रोख खर्च मिळेल, याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी दिली तर दिलासा मिळेल, अधिक स्पष्टता येईल आणि सकारात्मक चर्चा होईल, असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. (Prithviraj Chavan on Devendra Fadnavis)

“महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे 2 लाख 70 हजार कोटी रुपये मिळाले, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच त्यांनी विविध योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासवण्याचा प्रयत्न केला आहे, की महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“मी आधीच सांगितल्याप्रमाणे, विविध जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फक्त दोन लाख कोटी रुपये हे रोख रकमेचे (फिस्कल स्टीम्युलस) आहेत आणि उर्वरित पॅकेज हे कर्जाच्या स्वरुपातील (मॉनेटरी स्टीम्युलस) आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला त्या दोन लाखापैकी जास्तीत जास्त 20 हजार कोटी रुपये येऊ शकतात” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

हेही वाचा : केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला एकूण 28 हजार 104 कोटी रुपये, देवेंद्र फडणवीसांनी लेखाजोखा मांडला

“रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या (जीएसडीपीच्या) 5% रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करुन देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आणि ती रक्कम जवळपास 1 लाख 60 हजार कोटी आहे, असे सांगितले. ही दिशाभूल आहे. राज्यांना आधीपासून जीएसडीपीच्या 3% कर्ज घेण्याची परवानगी होतीच, ती आता 2 टक्क्यांनी वाढवून 5% पर्यंत करण्यात आली, हे खरे आहे. परंतु त्या वाढीव 2 टक्क्यांपैकी फक्त 0.5% रक्कम म्हणजेच जास्तीत जास्त 15-16 हजार कोटी रक्कम तातडीने मिळू शकतील. उर्वरित 1.5% रक्कमेची उचल (सुमारे 45 हजार कोटी रुपये) करण्याआधी अनेक अटी आणि निकष लावण्यात आलेले आहेत.” अशी आकडेमोड पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. (Prithviraj Chavan on Devendra Fadnavis)

हेही वाचा : 28 हजार कोटी दिले ते नेहमीचेच, वेगळं पॅकेज नाही, भाजपने महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं : नवाब मलिक

“केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये हे विविध घटकांना कर्ज रुपाने रक्कम देण्याची तयारी दाखवली आहे, पण त्यामध्ये अनेक शर्ती आहेत. जो त्या अटीशर्ती पूर्ण करेल, व ज्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता असेल, त्यालाच ते कर्ज मिळू शकेल. उदाहरणार्थ किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच हजार कोटी किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी तीन लाख कोटी रुपये. परंतु हे घटक ते कर्ज घेऊ शकतील का, आणि ते उत्सुक नसतील तर राज्य किंवा केंद्र शासन त्यांना सक्ती करु शकत नाहीत. त्यामुळे पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे ही हातचलाखी आहे.” असा घणाघात पृथ्वीबाबांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या वतीने किती कर्ज आणि किती ताबडतोब रोख मिळेल, याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी दिली तर दिलासा मिळेल, अधिक स्पष्टता येईल आणि सकारात्मक चर्चा होईल, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

संबंधित बातमी :

महाराष्ट्र सरकार स्थिर, भाजप सत्तेसाठी हपापलेलं : पृथ्वीराज चव्हाण