Prophet Muhammad Protest: भारताच्या मुस्लिमांचंही ऐका, नुपूर शर्मांना अटक करा, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचा काय इशारा?

मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरत आहेत.

Prophet Muhammad Protest:  भारताच्या मुस्लिमांचंही ऐका, नुपूर शर्मांना अटक करा,  एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचा काय इशारा?
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 5:47 PM

औरंगाबादः भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांनी (Nupur Sharma) केलेल्या वक्तव्यानंतर भारतातल्या असंख्य मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियातून निषेध केला. पण केद्रातील भाजप सरकारनं काहीही कारवाई केली नाही. एक प्रकारे सरकारचं नुपूर शर्मांना समर्थन असल्यासारखी वर्तणूक दिली. पण जगातील अरब देशांनी (Arab Countries) पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाचक्की केली. बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. तेव्हा सरकारनं माफी मागितली. जगभरातल्या मुस्लिमांनी धमकी दिल्यानंतर मोदी सरकारनं ऐकलं, मग भारतातल्या मुस्लिमांच्या नाराजीकडे सरकारनं दुर्लक्ष का केलं, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केला. भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मांनी मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आज महाराष्ट्रासह देशभरातील मुस्लिमधर्मीयांनी निषेध व्यक्त केला. हजारोंच्या संख्येने मुस्लिमांचे जथ्थे आज रस्त्यावर उतरले. औरंगाबादमध्येही आयुक्तालयासमोर हजारो मुस्लिमांचा जमाव एकत्र झाला होता. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी इम्तियाज जलील यांना शांततेचं आवाहन करण्यास सांगितलं. हा जमाव शांत झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुस्लिमांचं म्हणणं काय?

महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम धर्मीयांचं नेतृत्व करणाऱ्या एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आज नुपूर शर्मांविरोधात सरकारने कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. खा. जलील म्हणाले ,’ ज्या दिवशी टीव्हीवरील कार्यक्रमात नुपूर शर्मांनी हे वक्तव्य केलं, भाजपने त्याच दिवशी पक्षातून बाहेर काढायला हवं होतं. टीव्ही चॅनेलने ही चर्चाही बंद करायला हवी होती. असे वाद चालवूच नयेत. ..भारतातील मुस्लिमांनी यावर आक्षेप घेतला, निषेध व्यक्त केला. सोशल मीडियावर टिप्पणी केली. तेव्हा सरकारने याकडे दुर्लक्ष केलं. सरकार शांत बसून नुपूर शर्मांच्या वक्तव्याचं जणू समर्थन करत होतं. पण सौदी अरब, कतार, दुबईसारख्या देशांनी नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो कचरा कुंडीवर लावला आणि त्यावर बुटांचं निशाण लावलं, तेव्हा आम्हालाही चांगलं वाटलं नाही. ते आमचेही पंतप्रधान आहेत. पण अरब देशांनी जगभरातून निषेध व्यक्त केला तेव्हा नुपूर शर्मांवर कारवाई झाली. मग आम्हीदेखील बहिष्कार टाकणं अपेक्षित आहे? असा सवाल खा. जलील यांनी केला.

मुस्लिम धर्मीयांना शांततेचं आवाहन

मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आपला हक्क असला तरीही शहराची शांतता भंग होऊ देऊ नका, असं आवाहन खा. जलील यांनी यावेळी केलं. औरंगाबादच्या मोर्चाविषयी बोलताना खा. जलील म्हणाले, ‘ ज्या गोष्टीसाठी आपण एकत्र आलो आहोत, त्याआडून कुणी शहराच्या शांततेला धोका पोहोचवत असेल तर त्याच्यावर कारवाई झालच पाहिजे. आजच्या मोर्चात अनेक तरुण नशेबाज होते. त्यांना मीदेखील ओळखतो. तमाम मुस्लिमांनी यांना ओळखून त्यांना पोलिसात देण्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्रच नाही तर देशभरातील मुस्लिमांना आवाहन करतो की, नुपूर शर्मा प्रकरणाविरोधात कारवाई झाली पाहिजे. तुम्ही रस्त्यावर उतराच, पण सरकारमध्ये जाण्याचीही ताकद द्या…. रस्त्यावर आंदोलन करा पण शांततेत करा.