“राजीव, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काय केलं ते वारंवार सांगत बसू नका, तर ‘या’ मुद्द्यावर बोला”

महात्मा गांधीशी होणाऱ्या तुलनेवर राहुल गांधी स्पष्टच बोलले...

राजीव, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काय केलं ते वारंवार सांगत बसू नका, तर या मुद्द्यावर बोला
आयेशा सय्यद | Updated on: Dec 15, 2022 | 8:32 AM

मुंबई : “देशाच्या दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी महान काम केलं. त्यांनी जे काम केलं ते चांगलं होतं. आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. पण प्रत्येक सभेत त्यांनी काय-काय केलं ते लोकांना वारंवार सांगत बसू नका. तर आता आपण लोकांसाठी काय करू शकतो. आपल्या योजना काय आहेत.याविषयी लोकांशी बोला त्यांच्या मनात विश्वास निर्माण करा”, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या राजस्थानमध्ये आहे. यात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

महात्मा गांधी यांचं देशाच्या इतिहासात महत्वाचं स्थान आहे. त्या जागी मी कधीही जाऊ शकत नाही. गांधीजी आणि माझी तुलना कधीही होऊ शकत नाही. त्यांनी देशासाठी आयुष्य वाहिलं. अनेक वर्षे तुरुंगात घालवली. त्यांनी जे देशासाठी केलं त्याची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हा दोघांची तुलना कुणीही करता कामा नये, असं राहुल गांधी म्हणालेत.

काँग्रेसच्या एका नेत्याने भारत जोडो यात्रेतील राजस्थानच्या सभेत बोलताना गांधीजींची तुलना राहुल गांधीशी केली. त्यानंतर राहुल गांधी बोलायला उभे राहिले. तेव्हा त्यांनी अशी तुलना केली जाऊ नये, असं आवाहन केलं.

‘जय सियाराम’ म्हणण्याची राजस्थानमधील संस्कृती आहे. आरएसएसचे लोक ‘जय श्रीराम’ म्हणतात. त्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही ‘जय सियाराम’ का नाही म्हणत? ते सितामाईचा अपमान का करतात. त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही ‘जय सियाराम’ म्हणा. ते भारतातील महिलांचा सन्मान करत नाहीत. यांच्या संघटनेत एकही महिला नाही. ते महिलांना अपमानित करतात. ते जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना याविषयी प्रश्न विचारा, असं राहुल गांधी म्हणालेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us