ईडी, सीबीआयचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी, राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

| Updated on: Jul 02, 2021 | 3:10 PM

राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर बदनामीचा आरोप केलाय. तर दुसरीकडे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

ईडी, सीबीआयचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी, राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे (Rajendra Ghadage) यांच्या जरंडेश्वर कारखान्यावर (Jalendrashwar Sugar) जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर बदनामीचा आरोप केलाय. तर दुसरीकडे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. (Raju Shetty alleges that ED, CBI is being used for political blackmailing)

राजकीय ब्लॅकमेलिंगचा शेट्टींचा आरोप

मी अनेक दिवसांपासून सांगत आहे की, सीबीआय, ईडी या केंद्राच्या हातात आहेत. त्याचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो आहे. केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. 43 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे. कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत, अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपवरही टीका केलीय.

सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकला आहे. ईडीकडे 5 वर्षे फेऱ्या मारल्या. 43 कारखान्यांची यादी हवी असेल तर पुन्हा देतो. ईडी एकप्रकारे राजकीय दृष्ट्या काम करत आहे. अनेकदा मी ईडीकडे खेटे घातले. 5 वर्षांपूर्वी पुरावे दिले होते. मात्र, आता ही कारवाई करण्यात आली! याचा अर्थ ईडीला कुणीतरी सांगत आहे, अमूक अमूक माणूस त्रासदायक ठरतो, म्हणून त्याचा काटा काढायचा आहे, असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केलाय.

अजित पवारांची पहिली प्रक्रिया

आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सुंदरबाग सोसायटीने याचिका दाखल केली होती. 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. सर्व रीतसर परवानग्या घेतल्या होत्या, माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाहीय, सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जाऊ, असं अजित पवार म्हणाले.

जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई

अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं आहे. यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा कारखाना अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्यावर असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या :

ED ची कारवाई सुरु, अजित पवारांच्या मामाचा साखर कारखाना जप्त

जरंडेश्वर तर हिमनगाचे टोक, अमित शाहांना पत्र लिहितोय, एक एक नाव समोर येईल : चंद्रकांत पाटील

Raju Shetty alleges that ED, CBI is being used for political blackmailing