Rajyasabha Election | चुरस दोन मल्लांची , जखम तिसऱ्याच्या जिव्हारी, संजय पवारांच्या पराभवानं कोल्हापुरात मुन्ना विरुद्ध बंदी वाद उफाळणार?

| Updated on: Jun 11, 2022 | 4:54 PM

राज्यसभेतील विजयावर प्रतिक्रिया देताना धनंजय महाडिक म्हणाले, ' सहावी जागा म्हणजे रिस्क होती. पण भाजपाच्या पाठिंब्याने ती जिंकलो. यानिमित्ताने महाडिक कुटुंबियांचा बॅड पॅच संपला.'

Rajyasabha Election | चुरस दोन मल्लांची , जखम तिसऱ्याच्या जिव्हारी, संजय पवारांच्या पराभवानं कोल्हापुरात मुन्ना विरुद्ध बंदी वाद उफाळणार?
धनंजय महाडिक, संजय पवार, सतेज पाटील
Follow us on

मुंबईः राजकीय बदलापूर अशी कोल्हापूरची ओळख आहे. राजकीय आखाड्यात झालेला पराभव इथं एवढा जिव्हारी लागतो की पुढच्या वेळी त्याचं उट्टं काढलं जातं. राज्यसभेच्या निमित्तानं कोल्हापुरातही राजकीय आखाडा रंगला होता. कोल्हापूरमधून भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) ऊर्फ मुन्ना महाडिक आणि शिवसेनेचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांच्यातल्या लढतीवर अवघ्या महाराष्ट्राची नजर होती. पण भाजपनं गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सूत्र हालवत, अत्यंत चोख राजकीय डावपेच खेळत धनंजय महाडिकांना निवडून आणलं आणि कोल्हापूरच्या दोन मल्लांपैकी एका मल्लाला पराभूत व्हावं लागलं. संजय पवारांचा हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी तर लागलाच पण तितकीच जखम कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) ऊर्फ बंटी पाटील यांनाही झालीय. कारण मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील हा संघर्ष जुनाच आहे. राज्यसभेच्या निमित्तानं तो प्रतिष्ठेचाही बनला होता. पण यात बंटी पाटील समर्थित उमदेवाराची हार झाल्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी उफाळून येण्याची चिन्ह आहेत.

मुन्ना विरुद्ध बंटी वाद काय?

धनंजय (मुन्ना) महाडिक आणि सतेज (बंटी) पाटील हे दोघेही कोल्हापुरच्या महादेवराव महाडिक यांच्या तालमीत तयार झालेले मल्ल. मात्र पक्के राजकीय वैरी. या दोघांच्या शत्रुत्वामागेही राजकीय षड्यंत्र असल्याचं म्हटलं जातं. 2004 मध्ये शिवसेनेतून पराभव झाल्यानं धनंजय महाडिक 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले. त्यावेळी सतेज पाटलांनी त्यांना मदत केली होती. धनंजय महाडिक विजयी झाले. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीत सतेज पाटीय यांच्याविरोधात धनंजय महाडिकांचे चुलत भाऊ अमल महाडिक उतरले आणि सतेच पाटलांचा पराभव झाला. लोकसभेत महाडिकांना मदत करूनही विधानसभेत दगाफटका बसल्यानं महाडिक आणि पाटलांविरोधातलं शत्रुत्व वाढत गेलं. त्यानंतर महाडिकांचं राजकीय अस्तित्वच संपवायचा निश्चय बंटी पाटलांनी केला. नंतरच्या विधानपरिषद, लोकसभा, विधानसभा, जि.प., महापालिका आदी निवडणुकांमध्ये महाडिकांना पराभव सहन करावा लागला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही सतेज पाटील गटाचा विजय झाला. आताही धनंजय महाडिकांचा पराभव करण्याची पूर्ण तयारी सतेज पाटलांनी केली होती. मात्र भाजपचे दिग्गज ज्यांच्या पाठिशी आहेत, त्यांचं कुणीही आडवू शकत नाहीत, असंच राज्यसभेच्या निवडणुकीतून दिसून आलं. धनंजय महाडिकांचा विजय झाला आणि सतेज पाटील ज्यांच्या पाठिशी होते, ते संजय पवार पराभूत झाले. आता संजय पाटलांचा पराभव जिव्हारी लागल्यानंतर सतेज पाटील पुढील निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलं आहे.

महाडिक म्हणतात ‘बॅडपॅच’ संपला

राज्यसभेतील विजयावर प्रतिक्रिया देताना धनंजय महाडिक म्हणाले, ‘ सहावी जागा म्हणजे रिस्क होती. पण भाजपाच्या पाठिंब्याने ती जिंकलो. यानिमित्ताने महाडिक कुटुंबियांचा बॅड पॅच संपला.’

संभाजीराजेंची भूमिका काय?

धनंजय महाडिक यांच्या निमित्ताने कोल्हापूरचं नाव पुन्हा एकदा राज्यसभेवर कोरलं गेलंय. शिवसेनेकडून संजय पवार यांना उभं केलं नसतं तर कोल्हापुरातलेच नेते छत्रपती संभाजी महाराज हे राज्यसभेसाठी इच्छुक होते. त्यांनी तशी इच्छाही जाहीर केली होती. आपण अपक्ष म्हणून राज्यसभेला उभे राहणार असून सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र शिवसेनेनं पाठिंबा नाकारल्यानं त्यांनी राज्यसभेतून माघार घेतली आणि शिवसेनेनं कोल्हापुरातूनच संजय पवारांना उमेदवारी दिली. काल मतमोजणी सुरु असताना संभाजीराजेंनी अगदी सूचक ट्वीट केलं होतं. निकाल काहीही आला तरी कोल्हापुरचा मल्ल विजयी होणार, असं ते म्हणाले. त्यानंतर आजपासून स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढण्याची मोहीम हाती घेत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.