Ramdas Athawale : ‘..तर आज राज ठाकरेही मुस्लिम झाले असते!’ रामदास आठवलेंचं वक्तव्य; आईच्या आठवणीने आठवले भावूक

| Updated on: May 09, 2022 | 7:03 PM

जर छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले नसते तर आज कदाचित राज ठाकरे सुद्धा मुसलमान झालेले असते', असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय.

Ramdas Athawale : ..तर आज राज ठाकरेही मुस्लिम झाले असते! रामदास आठवलेंचं वक्तव्य; आईच्या आठवणीने आठवले भावूक
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : ‘गावातील दलित आणि सवर्ण आहेत आमचे मित्र कारण आमच्या मनात आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र’, अशा चार ओळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगलीत सादर केल्या. तसंच आठवले यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारले. जर छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले नसते तर आज कदाचित राज ठाकरे (Raj Thackeray) सुद्धा मुसलमान झालेले असते’, असं वक्तव्य केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Loudspeaker on Mosque) मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. त्यांच्या भोंग्यांविरोधातील भूमिकेला रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर आता आठवले यांनी वरील वक्तव्य केलं आहे.

रामदास आठवले यांच्या मूळगावी संगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बुद्ध तसेच सर्व महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले, मुलगा जित आठवल, आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘आज कदाचित राज ठाकरे सुद्धा मुस्लिम असते’

तोफा डाग अशा बुलंद घोषणा देत आम्ही आंबेडकरी विचार गावागावात पोहोचविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पायातील गुलामीच्या शृंखला तोडल्या. आम्ही डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दलित, मराठा, मुस्लिम सर्व जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी मुकाबला केला नसता तर इतिहास वेगळा झाला असता. मराठी मुलुखात मुघल असते आणि आज कदाचित राज ठाकरे सुद्धा मुस्लिम असते, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

मूळ गावी आठवलेंचा सत्कार

रामदास आठवले यांचे मुळगाव असलेल्या ढालेवाडीतील त्यांच्या घराचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. मातृदिनाचे औचित्य साधत या घराला मातोश्री नाव देऊन घराचे उदघाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावात महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ढालेवाडी गावचे सुपुत्र भारत सरकारचे दोन वेळा राज्य मंत्री झाल्याबद्दल रामदास आठवले यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.

अन् रामदास आठवले भावूक झाले

ढालेवाडी गावात रस्ते बांधून विविध विकास कामे करण्यात येतील. तसंच गावात दिवंगत हौसा आई आठवले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बहुउद्देशीय सभागृह आणि प्रशिक्षण केंद्र उभारून मातोश्री हौसा आईचे स्मारक उभारू. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या, कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या, तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या रूपाने मातोश्री हौसाआई आठवले यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा आठवले यांनी केली. माझ्या आईने खूप कष्ट केले. मला वाढविले, तिचे उपकार फिटणार नाहीत. आज जागतिक मातृदिनी आईची आठवण येते. मी माझ्या आईला आदरांजली अर्पण करतो असं आठवले म्हणाले. त्यावेळी ते भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.