Vidhan Parishad Election | भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी, आठवलेंचं फडणवीस-चंद्रकांतदादांना पत्र

| Updated on: May 04, 2020 | 4:55 PM

(Ramdas Athawale demands seat to RPI in Vidhan Parishad Election)

Vidhan Parishad Election | भाजपने विधानपरिषदेची एक जागा रिपाइंला सोडावी, आठवलेंचं फडणवीस-चंद्रकांतदादांना पत्र
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने आपल्या कोट्यातील एक जागा ‘रिपाइं’ला द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. (Ramdas Athawale demands seat to RPI in Vidhan Parishad Election)

‘विधानपरिषदेच्या 9 जागांपैकी चार जागा भाजपला जिंकता येण्याची शक्यता आहे. या चार जागांपैकी एक जागा भाजपने रिपाइंला देऊन सामाजिक समतोल साधावा. या मागणीचे पत्र आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहे. त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करणार आहे.’ असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

हेही वाचा : शिवसेनेकडून विधानपरिषदेचे उमेदवार निश्चित, उद्धव ठाकरेंसह दुसरा उमेदवारही ठरला

भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांच्या वेळी तिकीट नाकारलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचं खुद्द खडसेंनी कालच सांगितलं होतं.

याशिवाय माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. आधीच तीन जागांसाठी चार नावं शर्यतीत असताना, आठवलेंच्या पक्षाला संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे.

दुसरीकडे, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत आणा, एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी राज्यात 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. शिवसेनेने दोन उमेदवार जाहीर केल्याने आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कोणाला तिकीट देणार, याची उत्सुकता आहे.

कोणत्या जागांसाठी निवडणूक

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.

(Ramdas Athawale demands seat to RPI in Vidhan Parishad Election)