Ramdas Athawale : शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोग देऊ शकतो; रामदास आठवलेंच्या विधानाचा अर्थ काय?

| Updated on: Aug 16, 2022 | 5:59 PM

Ramdas Athawale : बिहारमधील राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं. नितीशकुमार आधी लालूं सोबत होते. नंतर मोदींसोबत गेले. आता पुन्हा मोदींसोबत येतील. नितीशकुमार यांचे बिहारमधील सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

Ramdas Athawale : शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोग देऊ शकतो; रामदास आठवलेंच्या विधानाचा अर्थ काय?
शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोग देऊ शकतो; रामदास आठवलेंच्या विधानाचा अर्थ काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक: खरी शिवसेना (shivsena) कुणाची? यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग शिवसेनेचं सुकाणू कुणाच्या हातात देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी मोठं विधान केलं आहे. खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल निवडणूक आयोग देऊ शकतो, असं भाकीत रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याकडे शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणावर आले आहेत. 2/3 आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याने शिवसेना पक्षाची मान्यता आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना मिळेल, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

रामदास आठवले हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हे भाकीत वर्तवलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन करून जागा जास्त असताना देखील शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. अशा गोष्टी राजकारणात अभावानेच घडतात, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

 

अपघाताची चौकशी झालीच पाहिजे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला. त्यांच्या अपघातावर काही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. ओबीसी समाजला देखील राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

12 आमदारांच्या यादीत आम्हालाही स्थान द्या

रिपब्लिकन पक्ष आम्हाला अजून वाढवायचा आहे. आमच्या पक्षाला राज्यात एक मंत्रिपद मिळावं ही आमची मागणी आहे. 12 आमदारांच्या यादीत आम्हाला देखील स्थान मिळायला हवं, असं ते म्हणाले. 2024 मधील निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील. भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. घराणेशाही विरोधात मोदी काम करत आहेत. अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

नितीश सरकार फार काळ टिकणार नाही

बिहारमधील राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं. नितीशकुमार आधी लालूं सोबत होते. नंतर मोदींसोबत गेले. आता पुन्हा मोदींसोबत येतील. नितीशकुमार यांचे बिहारमधील सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा करतानाच नितीश कुमार भाजप सोडून गेल्यानं एनडीएला काही फरक पडणार नाही. त्यांनी धोका दिला त्यांचे आमदार फुटून परत येतील, असं ते म्हणाले.

भाजप मित्र पक्ष संपवत नाही

भाजप मित्र पक्ष संपवत आहे हे खरं नाही. माझा पक्ष वाढतोय. मला तसा अनुभव आला नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीशकुमार चेहरा नाही. मोदींच्या समोर, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, सोनिया गांधी, शरद पवार कुठलेच चेहरे चालणार नाहीत. मी मोदींच्या पाठिशी आहे. त्यामुळे त्यांना घाबरण्याचे कारण नाही, असं त्यांनी सांगितलं.