ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार, काँग्रेस पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार : रामदास आठवले

| Updated on: Dec 29, 2020 | 2:59 PM

"काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार", असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला (Ramdas Athawale said thackeray government will collapse)

ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार, काँग्रेस पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार : रामदास आठवले
रामदास आठवले
Follow us on

औरंगाबाद : “युपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. मात्र, शिवसेना युपीएचा घटक नाही. शिवसेनेच्या या मागणीमुळे ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार आहे. काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार आहे”, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. आठवले सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य केलं (Ramdas Athawale said thackeray government will collapse).

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसवर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत नोटीसला घाबरत नाही तर त्यांनी ईडीला हिशोब द्यावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार आणि शिवसेनेचा पराभव होईल, असा दावा त्यांनी केला (Ramdas Athawale said thackeray government will collapse).

‘शेतकऱ्यांनी 2020 मधील आंदोलन 2021 मध्ये नेऊ नये’

“दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात फक्त पंजाबचे शेतकरी आहेत. इतर राज्यातील फक्त संघटना या आंदोलनात सहभागी आहेत. दुसऱ्या राज्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. शेतकऱ्यांनी तडजोड केली पाहिजे आम्ही सुद्धा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात तडजोड केली. कृषी कायदे मागे घेतले तर संसद आणि संविधानाला महत्त्व राहणार नाही. शेतकऱ्यांनी 2020 मधील आंदोलन 2021 मध्ये नेऊ नये”, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं.

‘शरद पवारांनी सूचना द्याव्यात’

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्व विरोधकांची बैठक घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण शरद पवार यांनी कृषी कायद्यात काय सुधारणा करायच्या याच्या सूचना केल्या पाहिजेत आणि संवाद साधला पाहिजे. उद्योगपती अदानी-अंबानी यांना उद्योग करण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. त्यांनाच माल विकला पाहिजे असं काही नाही, त्यांच्यासाठी हा कायदा नाही”, असं रामदास आठवले म्हणाले.

‘ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना पाच एकर जागा मिळावी’

“विजबील माफ केलं पाहिजे. त्याचबरोबर मागासवर्गीय महामंडळाचं, मागासवर्गीयांचं कर्ज माफ केलं पाहिजे. भूमिहीनांना पाच एकर जमिनी मिळाल्या पाहिजेत. गावाचा सर्व्हे करून प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन मिळाली पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत लाखो एकर जमीन दान करण्यात आली होती. ती जमीन नक्की कुणाला मिळाली याची माहिती मिळाली पाहिजे, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. ज्या जमिनीत मोठी झाडे येत नाहीत अशी वन विभागाची जमीन राज्य सरकारने ताब्यात घ्यावी आणि ती जमीन सर्वांना वाटावी”, असं आठवले यांनी सांगितलं.

‘रिपब्लिकन पक्षांचं ऐक्य होऊ शकणार नाही’

“रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांची ओळख आहे, ती ओळख मी कधीही पुसणार नाही. अनेक लोक रिपब्लिकन पक्षाची ओळख पुसत आहेत. तसा द्रोह मी कधीही करणार नाही. रिपब्लिकन पक्षांचं ऐक्य होऊ शकणार नाही, मी ऐक्यासाठी कधीही तयार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘प्रकाश आंबेडकरांचा वंचितचा प्रयोग अपयशी’

“वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा प्रयोग केला. पण त्यांचा एकही माणूस निवडून आला नाही. फक्त मत खाण्यासाठी हा प्रयोग झाला. विधानसभेला 288 जागा लढवल्या पण एकाही जागेवर यश मिळालं नाही. प्रकाश आंबेडकर यांना ऐक्य करायचं नसेल तर त्यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा, सोबत काम करता येईल”, असं आवाहन त्यांनी केलं.