शिवसेना 135, भाजप 135, मित्रपक्ष 18, रामदास आठवलेंनी फॉर्म्युला सांगितला

| Updated on: Sep 05, 2019 | 3:02 PM

'विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप (Shiv Sena- BJP)  135-135 आणि मित्रपक्ष 18 जागा असा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीवेळी ठरला होता'

शिवसेना 135, भाजप 135, मित्रपक्ष 18, रामदास आठवलेंनी फॉर्म्युला सांगितला
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप (Shiv Sena- BJP)  135-135 आणि मित्रपक्ष 18 जागा असा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीवेळी ठरला होता, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिली. युतीतील मित्रपक्षांपैकी रिपाई (RPI) हा सर्वात मोठा पक्ष असल्याने आम्हाला 10 जागा द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 22 ते 23 जागांची यादी दिली  आहे, असं रामदास आठवलेंनी सांगितलं.

भाजप-शिवसेना फायनल होईल त्यावेळी आम्हाला कुठल्या जागा द्यायच्या हे ठरेल. समस्या ही आहे भाजपने गेल्यावेळी आम्हाला ज्या 8 जागा दिल्या, त्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. जर RPI ला सोबत ठेवायचे असेल तर काही सिटिंग जागा शिवसेना भाजपकडून मिळायला हव्यात ही अपेक्षा आहे, असं आठवले म्हणाले.

माझा पक्ष रजिस्टर असातना भाजपच्या चिन्हावर का लढायचं, त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. अद्याप त्याबाबत विचारविनीमय सुरु आहे, असंही त्यांनी सांगितलं.

रिपब्लिकन पक्षाने असे ठरवले आहे की पक्षाची ओळख वेगळी ठेवायची असेल तर आपल्या चिन्हावर लढले पाहिजे. मी महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी बोलणार आहे. स्वतंत्र चिन्ह द्यावे  त्यासाठी प्रयत्न आहे, असं आठवलेंनी नमूद केलं.

आमच्याच चिन्हावर लढणार

आम्ही आमच्या चिन्हावर लढणार आहोत. आमच्या चिन्हावर लढलो आणि आमचे 5 ते 6 आमदार निवडून आले तर ते आमचे असतील. नाहीतर देशभरात संदेश जाईल की भाजपच्या चिन्हावर लढल्यामुळे ते आमदार भाजपचे आहेत, असं आठवले म्हणाले.

पाठिंबा हवा

यावेळी वातवरण अत्यंत चांगले आहे. मी यापूर्वी 3 वेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलो. तेव्हा ना कधी काँग्रेसचा पंजा घेतला ना राष्ट्रवादीचे घड्याळ घेतले. मी माझ्या चिन्हावर निवडून आलो. त्यामुळे असे म्हणता येणार नाही की रिपाईच्या चिन्हावर जिंकता येत नाही. कमळाचा फायदा होऊ शकेल. पण शिवसेना भाजपचा पाठिंबा राहिला तर आणखी चांगलं होईल, असं आठवलेंनी सांगितलं.

शिवसेना भाजप एकत्र लढतील. लाँग पॉलिटिक्ससाठी शॉर्टकटचा विचार न करता लाँगटर्म पॉलिटिक्सचा विचार दोन्ही पक्षांनी करावा अशी माझी भूमिका सुरुवातीपासून आहे, असं आठवले म्हणाले.

महायुतीमध्ये लढलो तर 235 ते 240 जागा निवडून येऊ शकतात. लोकसभेत आणि विधानसभेत वेगळं चित्र असू नये असे माझे व्यक्तिगत मत आहे, असं आठवलेंनी सांगितलं.