बाळासाहेब जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत गेली असती का? रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना सवाल

| Updated on: Aug 07, 2022 | 4:01 PM

शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत युती करु शकली असती का? असा थेट सवाल कदम यांनी आदित्य ठाकरेंना विचारलाय.

बाळासाहेब जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत गेली असती का? रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना सवाल
रामदास कदम, आदित्य ठाकरे
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली असून शिंदे गट आणि ठाकरे गट अशी शिवसेनेची अवस्था झालीय. शिवसेनेतील (Shivsena) 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तसंच राज्यभरातील अनेक पदाधिकारी आणि नेतेही शिंदे गटात सहभागी झालेत. त्यात माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचाही समावेश आहे. शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत युती करु शकली असती का? असा थेट सवाल कदम यांनी आदित्य ठाकरेंना विचारलाय.

रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत युती करु शकली असती का? याचं उत्तर मला आदित्य ठाकरे यांनी द्यावं आणि नंतर गद्दाराची व्याख्या ठरवावी. पर्यावरण मंत्री असताना माझ्या खात्याचा सर्व कारभार आदित्य ठाकरेच चालवायचे असा गौप्यस्फोटही रामदास कदम यांनी केलाय. तसंच फ्रेन्डशीप डे साठी माझ्या मातोश्री आणि उद्धवजींना शुभेच्छा. मी शिंदे आणि ठाकरेंना पुन्हा एकत्र आणण्यासाठी शिंदे गुवाहाटीला असताना प्रयत्न केला. मात्र तेव्हा ते झालं नाही. आता लढाई कोर्टात आहे. त्यामुळे आता ते एकत्र येतील की नाही यावर बोलणं योग्य नाही, असं सूचक वक्तव्यही रामदास कदम यांनी केलंय.

नेहमी विरोधी पक्षनेते राहण्यासाठी अजितदादांना शुभेच्छा

मंत्रिमंडळ विस्तारावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर खोचक टीका करत आहेत. त्याबाबत विचारलं असता अजित पवार हे चांगले विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना माझ्या नेहमी विरोधी पक्षनेता राहण्यासाठी शुभेच्छा असल्याचा टोलाही कदम यांनी अजितदादांना लगावलाय.

‘उद्धवजी, हे पाप करू नका’

19 जुलै रोजी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना मराठी माणसाची शिवसेना या घोषवाक्यांने सुरुवात केली. त्यांनी हिंदुत्वासाठी अख्खं आयुष्य घालवलं. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आयुष्यभर संघर्ष केला. त्या शिवसेनाप्रमुखांचा चिरंजीव राष्ट्रवादीसोबत बसून मुख्यमंत्री होतो हे कळल्यावर मी त्यांना हात जोडले. म्हटलं उद्धवजी, हे पाप करू नका. हे साहेबांना आवडणार नाही. आपल्या पक्षाची ताकद वाढवू. व्हा तुम्ही मुख्यमंत्री. आपले आमदार निवडून आणू. पण साहेबांचं असं स्वप्न नव्हतं. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष केला. त्यांना घेऊन मुख्यमंत्री व्हा, असं स्वप्न साहेबांचं नव्हतं. साहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं, असा दावा कदम यांनी केला होता.