जावई ना माझं ऐकतो, ना उद्धव ठाकरेंचं, खैरेंना ‘ती’ भीती : दानवे

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीच्या ‘न्यूजरुम स्ट्राईक’ या कार्यक्रमात बोलताना लोकसभा निवडणुकीतील अनेक वादांवर दिलखुलास उत्तरे दिली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मदत न करता दानवे यांनी जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोप खुद्द चंद्रकांत खैरेंनी केला. दानवेंनी युती धर्माऐवजी जावई धर्म पाळला, या […]

जावई ना माझं ऐकतो, ना उद्धव ठाकरेंचं, खैरेंना ती भीती : दानवे
Follow us on

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीच्या ‘न्यूजरुम स्ट्राईक’ या कार्यक्रमात बोलताना लोकसभा निवडणुकीतील अनेक वादांवर दिलखुलास उत्तरे दिली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मदत न करता दानवे यांनी जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोप खुद्द चंद्रकांत खैरेंनी केला. दानवेंनी युती धर्माऐवजी जावई धर्म पाळला, या आरोपावर रावसाहेब दानवेंनी उत्तर दिलं.  “जावई हर्षवर्धन जाधव माझंही ऐकत नाही आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंही ऐकत नाही”, असं रावसाहेब दानवे म्हणाले. यातून दानवेंनी एकप्रकारे जावयापुढे हतबल असल्याचेच दाखवण्याचा प्रयत्न केला.

जावयाला समजवण्याचा प्रयत्न

दानवे म्हणाले, “हर्षवर्धन जाधव यांना निवडणूक लढवू नका असे समजावले, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी माझं ऐकलं नाही. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही जावयाला समजावून सांगण्यास सांगितले, पण जावयाने त्यांचेही ऐकले नाही. त्यांचं स्वतःचं साम्राज्य आहे. त्यामुळे ते कोणत्याही पक्षातून कोठेही उभे राहू शकतात. त्यांच्या अनेक पिढ्या राजकारणात आहेत. त्यांच्या आजोबांपासून वडिलांपर्यंत सर्व आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांना माझ्या मदतीची गरज नाही.”

स्थानिक वाद

भाजपकडून स्थानिक पातळीवर हर्षवर्धन जाधव यांना मदत झाल्याच्या आरोपवर विचारणा केली असता, दानवे म्हणाले, “जर स्थानिक पातळीवर भाजपच्या काही नगरसेवकांनी युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मदत न करता जाधव यांना केली असेल, तर तो स्थानिक वादाचा परिणाम असेल. त्यात माझा काहीही संबंध नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी युतीच्या उमेदवाराचाच म्हणजे चंद्रकांत खैरेंचाच प्रचार केला”

‘खैरेंना जातीवर मतदान होण्याची भीती’

दानवेंनी खैरेंच्या आरोपावर बोलताना सांगितले, “चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद मतदारसंघात जातवार मतदान होऊन मराठ्यांची मते मिळणार नाही असे वाटत असेल. मात्र, औरंगाबादमध्ये कधीही जातीवर मतदान झालेले नाही. खैरे याआधी 4 वेळा निवडून आले आहेत. मग तेव्हा काय जातीवर मतदान झाले होते का?” असा सवाल दानवेंनी विचारला.

नेमकं प्रकरण आहे?

औरंगाबादमध्ये चौरंगी लढत होत आहे. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, काँग्रेसकडून सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील, तर हर्षवर्धन जाधव हे अपक्ष लढत आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील लढत अत्यंत चुरशीची ठरली आहे. मात्र, मतदान पार पडल्यानंतरही औरंगाबादमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. शिवसेना-भाजपने युती करुन निवडणूक लढवली असली, तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या मदतीवर शंका व्यक्त करत, थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर युती धर्म मोडल्याचा आरोप केला आहे.

“रावसाहेब दानवेंनी प्रचाराच्या काळातच औरंगाबादच्या रुग्णालयात उपचाराच्या निमित्ताने पाच-सहा दिवस मुक्काम केला आणि राजकीय भेटीगाठी घेत जावयाला मदत केली. दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादच्या भाजपच्या 8 ते 10 नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचं उघडपणे काम केलं. जाधव यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. दानवे आणि त्यांचे जावई जाधव यांना आवरा” अशी तक्रार शिवसेनेचे खासादर चंद्रकांत खैरे यांनी थेट भाजपाध्यक्ष अमित शाह यांना भेटून केली.

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आरोपांनंतर दानवेंचे जावई आणि औरंगाबादमधील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं, “चंद्रकांत खैरे यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळे ते माझ्यावर बेछूट आरोप करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्या पत्नीला सांगितलं की, माझ्या पाठीशी संपूर्ण भाजप लावतो, पण प्रत्यक्ष त्यांनी मला निवडणुकीत काहीही मदत केली नाही.”

भाजपचं स्पष्टीकरण

खैरेंच्या या तक्रारीनंतर भाजपकडून पत्रक जारी करुन प्रतिक्रिया देण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठीच काम केलं. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरुन मी स्वतः मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करुन भाजप पदाधिकाऱ्यांसह प्रचार केला, असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटलं होतं.

न्युजरुम स्ट्राईकमधील रावसाहेब दानवेंची पूर्ण मुलाखत


चंद्रकांत खैरेंच्या आरोपावर हर्षवर्धन जाधव यांचे उत्तर