रश्मी ठाकरे उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, शिवसेना नेत्याच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण

उद्धव ठाकरे यांना अन्य कुणावर विश्वास नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा कारभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्याचा सल्लाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्याच एका नेत्यानं याबाबत केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे.

रश्मी ठाकरे उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, शिवसेना नेत्याच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण
रश्मी ठाकरें
| Edited By: sagar joshi | Updated on: Jan 04, 2022 | 4:36 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीच्या मणक्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर ते महत्वाच्या बैठका, हिवाळी अधिवेशनात अनुपस्थित राहिले. 1 जानेवारी रोजी नगरविकास खात्याच्या एका बैठकीनंतर ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेसमोर आले. मात्र, या काळात विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना अन्य कुणावर विश्वास नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा कारभार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) किंवा रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याकडे देण्याचा सल्लाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्याच एका नेत्यानं याबाबत केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे.

‘उद्धवसाहेब रश्मी ठाकरेंवर जबाबदारी देऊही शकतात’

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं वक्तव्य केलं आहे. सत्तार म्हणाले की, ‘रश्मी ताईची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून त्यांचं जे नियोजन असते. आज त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असतं. कारण त्या साहेबांच्या सोबत राहतात. आदित्य साहेब कसे काम करतात, मोठे साहेब कसं काम करतात, या सर्वांच्या पेक्षा एक महिला म्हणून त्यांचं नियोजन कसं असतं, कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत, त्यांचं बळकटीकरण कसं व्हायला पाहिजे, महिलांना फक्त चूल आणि मुल न करता, त्यांना सक्षम कसं करायला पाहिजे यासाठी ताईसाहेबांचं काम मोठं आहे. उद्धव साहेबांचा आदेश असेल तर मला वाटतं काहीही होऊ शकतं. मला वाटतं त्यांच्यावर जबाबदारी देऊही शकतात. आता त्या सामनाच्या मुख्य संपादक म्हणूनही उत्तम काम करत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे. राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे, असं मत सत्तार यांनी मांडलं आहे.

‘गडकरी भाजप-शिवसेनेचा पुल जोडू शकतात’

नितीन गडकरी साहेब हे राजकारणातील एक चालतं-बोलतं विद्यापीठ आहे. गडकरी हे राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी एकदा ठरवलं पुल बनवण्याचं तर कुठेही कसाही पुल बनवणे, कशामुळे जोडणे, कशाप्रकारे जोडणे, हे त्यांना चांगलं माहिती आहे. देशात त्यांचं मोठं नाव आहे. हा भाजप-शिवसेनेचा पुल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव साहेबांकडे जातील, उद्धव साहेबांना विनंती करतील. कारण हा निर्णय उद्धवसाहेबच घेऊ शकतात, असं मतही सत्तार यांनी व्यक्त केलं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असं पाटील म्हणाले होते.

इतर बातम्या :

भगव्याला दैवत मानलं, भगव्यालाच कवटाळून गळफास, उस्मानाबादेत कट्टर शिवनसैनिकाची आत्महत्या! काय घडलं??

कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्या विजयानं अजित पवारांना ‘वाईट’ वाटलं?; भाजपनं पुणे बँक निवडणुकीत खातं कसं उघडलं?

Follow Us