चाकणकरांची सून म्हणून आली आणि राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष झाली! कसा आहे रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रवास?

| Updated on: Aug 07, 2021 | 1:29 AM

रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळलं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.

चाकणकरांची सून म्हणून आली आणि राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष झाली! कसा आहे रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रवास?
रुपाली चाकणकर
Follow us on

सागर जोशी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या एक आक्रमक आणि करारी चेहरा सातत्याने पाहायला मिळतो. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विरोधकांकडून होणारा प्रत्येक वार झेलत हा चेहरा त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवताना दिसतो. अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील हुकमी एक्का म्हणून या चेहऱ्याकडे पाहिलं जात आहे. तो चेहरा म्हणडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर. रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळलं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. (Political journey of NCP Women’s Congress State President Rupali Chakankar)

दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रतत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेललीय. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. रुपाली चाकणकर यांच्याशी जेव्हा आमचं बोलणं झालं त्यावेळी त्यांचा राजकीय प्रवास उलगडत गेला.

तुमचा राजकारणाचा प्रवास नेमका कसा सुरु झाला?

2002 ते 2007 या कालावधीमध्ये सासूबाई रुक्मिणी चाकणकर या नगरसेविका म्हणून काम पाहत होत्या. त्यांच्या माध्यमातून बचत गटाच्या कामाला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात बचतगट स्थापन करुन राजकारणाचा प्रवास सुरु झाला. सुप्रियाताई सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झाल्यानंतर त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मला दिलं. तिथून म्हणजे 2008 सालापासून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं तालुकाअध्यक्षपद, पुढे पुणे शहराध्यक्षपद आणि आता प्रदेशाध्यक्षपद असा पक्ष संघटनेतील प्रवास सुरु आहे.

सुरुवातीच्या काळात तुमची आंदोलनं खूप गाजली होती. त्याबाबत काय सांगाल आणि तुम्हाला कोणती आंदोलनं चांगली आठवतात?

पुणे शहराध्यपदी स्थान मिळाल्यानंतर काही काळ सत्ताधारी पक्षाची शहराध्यक्ष म्हणून काम पाहता आलं. त्यानंतर महापालिकेतील सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षातील शहराध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. दोन्ही कालावधीमध्ये काम करत असताना चांगला अनुभव गाठिशी बांधता आला. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करताना सगळेच आंदोलन अनोख्या पद्धतीनं केले. या आंदोलनांमुळे अनेक गुन्हे दाखल झाले. आजही या आंदोलनाचे 12 गुन्हे दाखल आहेत. त्यात खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर महागाईविरोधात केलेलं आंदोलन असेल. दुसरं आंदोलन म्हणजे तानाजी सावंत यांनी खेकड्यांनी धरण फोडलं असं वक्तव्य केलं होतं. तेव्हा त्यांच्या घरी जाऊन खेकडे सोडले होते. त्यावेळी खेकड्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही केली होती. कारण, खेकडे जर धरण फोडू शकतात तर ते घरही फोडू शकतात आणि घरातील माणसांनाही धोका आहे, असा पवित्रा आम्ही घेतला होता. तेव्हा पोलीसही संभ्रमात होते की आता खेडक्यांवर गुन्हा कसा दाखल करायचा! त्याचबरोबर, पुण्याला आरोग्यप्रमुख नाही म्हणून आम्ही तिरडी बनवून त्यावर एका माणसाला झोपवून, त्याला सलाईन चालू करुन महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. जलपर्णीचा घोटाळा झाला तेव्हा तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात आम्ही जलपर्णी घेऊन आंदोलन केलं होतं. अनेक आंदोलनातून नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. तसंच त्या आंदोलनाची मदत संघटना बांधणीसाठी झाली. महत्वाची बाब म्हणजे मी जे जे आंदोलनं केली त्याला चांगलं यश मिळालं. ते प्रश्न मार्गी लागत होते. त्यामुळे ते समाधान अधिक होतं. (Political journey of NCP Women’s Congress State President Rupali Chakankar)

पुणे शहराध्यक्ष ते थेट प्रदेशाध्यक्ष! हे नेमकं कसं शक्य झालं?

2019 ची विधानसभा निवडणूक खडकवासला मतदारसंघातून लढवायची इच्छा व्यक्त करत मी अर्ज दिला होता. ज्या दिवशी माझी मुलाखत होणार होती, त्याच्या एक दिवस आधीच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष (चित्रा वाघ) पक्ष सोडून गेल्या आणि 24 तासाच्या आत माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजितदादा, जयंत पाटील आणि खासदार सुप्रियाताई यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला ही संधी दिली. माझ्यासाठी तो आनंदाचा दिवस होता की, निवडणूक लढवण्यासाठी मी अर्ज केला होता. पक्षाकडूनही मला मुलाखतीसाठी बोलावलं होतं आणि तिथे गेल्यानंतर मला प्रदेशाध्यक्षपद मिळालं. त्यानंतर पुढील दीड महिन्याच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनाबांधणीसाठी झंझावाती दौरा केला.

मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा विचार मी सोडून दिला. कारण, प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर उमेदवारी घेणं मलाही पटलं नाही. त्यावेळी मला अजितदादांनी विचारलं ही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? तेव्हा मी त्यांना सांगितलं की, प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर मी मतदारसंघात नाही. त्यामुळे तुम्ही ही संधी दुसऱ्या कुणाला देऊ शकता. माझ्यासाठी आंदनाची बाब ही आहे की, प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मी राज्यात मोठ्या प्रमाणात दौरे केले. त्या काळात अनेक महिला संघटनेशी जोडल्या गेल्या. आज प्रत्येत जिल्ह्यात आणि तालुक्यात माझ्याकडे ताकदीच्या महिला आहेत. निरीक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीची टीम मला मिळाली. गेल्या दीड-दोन वर्षात राज्यभरात आम्ही अनेक यशस्वी उपक्रम राबवले. महत्वाची बाब म्हणजे या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर शरद पवार आवर्जुन कौतुक करतात आणि शाबासकी देतात. त्यांनी दिलेली ही कौतुकाची थाप माझ्यासाठी 100 हत्तींचं बळ देणारी ठरते.

शरद पवारांबद्दल एखादा किस्सा, जो तुमच्या मनात कायम राहणारा ठरला आहे.

सुराज्य संवाद नावाचा कार्यक्रम आम्ही खासदार सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला होता. या माध्यमातून आयोजित सेमिनारमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 40 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी शरद पवारसाहेबांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती आम्ही केली होती. त्यावेळी त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि आम्हाला दुपारी चार नंतरचा वेळ दिला. साधारण 15 मिनिटे मी येईन असं साहेब म्हणाले होते. नियोजित दिवळी सेमिनार सुरु झाला आणि अचानक सकाळी 11 वाजताच साहेब सेमिनारला आले. त्यावेळी आम्ही सर्वच आश्चर्यचकीत झालो होतो. काय करावं सुचेना गेलं. मात्र, साहेबांनी कुठलिही औपचारिकता नको असं सांगत कार्यक्रमाला सुरुवात करण्यास सांगितलं. त्यावेळी साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधीला सविस्तर माहिती विचारली. तिथे कामाला असलेला वाव लक्षात घेतला. 15 मिनिटांची वेळ दिलेली असताना साहेब तब्बल दीड तास आमच्याशी गप्पा मारत राहीले. त्यावेळी काही महिलांनी आपल्या अडचणी साहेबांना सांगितल्या. तेव्हा साहेब त्यांना म्हणाले की, काही काळजी करु नका. अतिशय खंबीर अध्यक्ष तुम्हाला दिला आहे. रुपालीताई तुमच्या अडचणी सोडवतील. साहेबांनी दाखवलेला तो विश्वास माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला.  साहेबांनी कौतुक केल्याचा नाही, तर साहेब आपल्या कामावर समाधानी आहेत, याचा जास्ती आनंद मला आहे.

साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी वाटचाल करतेय. या पदाला न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यासाठी राज्यभर दक्षता कमिटीच्या माध्यमातून काम करत आहोत. कायदेदूत म्हणून आमच्या वकील महिलांची टीम राज्यभर महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम करत आहे. अशाप्रकारे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत याचं मला समाधान वाटतं.

ज्यावेळी तुम्ही एक सक्षम, खंबीर, समर्थ महिला म्हणून पुढे आला आहात. त्यावेळी तुम्ही अन्य महिला वर्गाला काय सांगाल?

सुरुवातीच्या काळात केवळ राजकारण नाही तर समाजकारणही मोठ्या प्रमाणात केलं आणि करत आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे शब्द बोथट ठरतात जेव्हा महिला सुरक्षित नसतात. पण महिल्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मी वैयक्तिकरित्या काम करत आहे. पण मला पुढे जाऊन सांगायचं आहे की, प्रत्येक महिलेला तिचं अस्तित्व असतं. महिलेचा संघर्ष हा जन्मापासून तो तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु असतो. शाळा, महाविद्यालयातील मुली, शेतकरी महिला, नोकरदार महिला अशा सगळ्यांना एक वेगळा संघर्ष करावा लागतो. अनंत अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या सगळ्या अडचणींना तोंड देत तिनं स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे या मताची मी आहे.

इतर बातम्या :

खेलरत्न पुरस्काराला हॉकीच्या जादूगाराचं नाव, का होतेय मोदींच्या निर्णयाचं कौतुक? वाचा 5 कारणे

कोकणावर सातत्याने ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करणारी तरुण आणि खंबीर राजकारणी; आदिती तटकरेंचा राजकीय प्रवास

Political journey of NCP Women’s Congress State President Rupali Chakankar