इस्रायल उगाच भारताचा खास मित्र नाही, स्वातंत्र्यदिनी त्यांच्या डिप्लोमॅटने मुंबई रेल्वे स्टेशनवर जे काम केलं, सगळ्या देशवासियांचं जिंकलं मन
आंतरराष्ट्रीय राजकारणात इस्रायल हा भारताचा हक्काचा, जवळचा मित्र आहे. इस्रायल उगाच भारताचा खास मित्र नाही. भारताचा काल 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला, त्यात इस्रायल सुद्धा मागे नव्हता.

भारताने काल 15 ऑगस्टला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारतीयांनी हा दिवस उत्साहात साजरा केलाच. पण भारताचा सच्चा मित्र इस्रायल सुद्धा यामध्ये मागे नव्हता.भारतात तैनात असलेल्या इस्रायली दूतावासातील एका राजनैतिक अधिकाऱ्याने एका खास पद्धतीने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. आपल्या कृतीने या इस्रायली अधिकाऱ्याने देशवासियांची मनं जिंकली. त्याच्या या कृतीची सोशल मीडियावर इतरत्र, सर्वत्र चर्चा होत आहे. या इस्रायली अधिकाऱ्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सवर CSMT इथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तिरंगा झेंडा वाटून भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. मुंबईतील इस्रायलच्या उप वाणिज्यदूत अविशाग हेफर यांनी सीएसएमटी येथे प्रवाशांना भारताचा तिरंगा ध्वज वाटून भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
इस्रायलला समर्पित असलेल्या एक्स हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हर घर तिरंगा मोहिमेचा हा भाग असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. इस्रायलच्या उप वाणिज्यदूत अविशाग हेफर यांनी सीएसएमटी येथे प्रवाशांना भारताचा तिरंगा झेंडा वाटून मनापासून भारतीयांना 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य, मैत्री आणि भारताचा जोश याचं हे सेलीब्रेशन होतं, असं पोस्टमध्ये म्हटलय.
लहान मुलाकडून सॅल्यूट
व्हिडिओमध्ये अविशाग हेफर यांनी सफेद शर्ट आणि ब्लॅक स्कर्ट घातल्याचं दिसतय. त्यांच्या हातात अनेक तिरंगे झेंडे आहेत. त्या स्टेशन परिसरात फिरुन प्रवाशांना तिरंगा ध्वन वाटताना दिसतायत. लोक सुद्धा हसून त्यांच्याकडून तिरंगा ध्वज स्वीकारत आहेत. एका लहान मुलाने त्यांच्या हातून ध्वज घेतल्यानंतर सॅल्यूट सुद्धा केला. सोशल मीडियावर या संबंधी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारत आणि इस्रायलची मैत्री नेहमीच भक्कम राहिलं असं एका युजरने लिहिलय. दुसऱ्याने इस्रायल भारताचा सर्वात जवळचा मित्र असल्याचं म्हटलं आहे.
हाय-टेक टेक्नोलॉजी भारताला दिली
आंतरराष्ट्रीय राजकारणात इस्रायल हा भारताचा हक्काचा, जवळचा मित्र आहे. कारगिल युद्धाचं संकट असो किंवा काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद 370 रद्द करणं इस्रायल नेहमीच भारताच्या पाठीशी उभा राहिला आहे. इस्रायल आणि भारतामध्ये उत्तम संरक्षण संबंध आहेत. इस्रायलने नेहमीच त्यांची हाय-टेक टेक्नोलॉजी भारताला दिली आहे.
