शिंदे गटाच्या ‘या’ आमदारानेही म्हटलं की, ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड व्हावी, कारण….

राज ठाकरे, शरद पवार यांच्यानंतर आता थेट शिंदे गटातल्या कोणत्या आमदाराने बिनविरोध निवडणूक होण्याची इच्छा व्यक्त केली?

शिंदे गटाच्या या आमदारानेही म्हटलं की, ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड व्हावी, कारण....
अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 17, 2022 | 7:37 AM

गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक (Andheri East by Election) बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यानंतर आता खुद्द शिंदे गटातील एका आमदारानेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे (CM Eknath Shinde) तशी मागणी केली आहे. ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीबाबत आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली आहे. महाराष्ट्राची संस्कृती पाहता, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. मात्र अखेर याबाबतचा निर्णय भाजपकडूनच घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पाहा व्हिडीओ :

रमेश लटके हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यांच्या निधनाबाबतही सगळ्यात आधी माहिती दुबईतून ज्यांना कळली, त्यापैकी मी देखील एक होतो, असंही सरनाईक यांनी म्हटलं. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे, माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, असंही ते म्हणाले. मात्र यावर अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर भाजपकडून घेतला जाईल, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. मुरजी पटेल आणि ऋतुजा लटके या दोघांनीही अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोघांकडूनही यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यात आलं होतं.

शिंदे गटाने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता भाजपवर ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून दबाव वाढत असल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी विनंती केलीय. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही तसंच आवाहन केलं आहे. त्यानंतर रविवारी रात्री भाजपच्या नेत्यांची बैठकही पार पडली होती. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आता मुरजी पटेल हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.