“आमच्या शिवरायांना विकू नका!”, सामनातून कुणाला इशारा?

| Updated on: Nov 14, 2022 | 7:54 AM

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून इतिहासाच्या मोडतोडीवर भाष्य करण्यात आलंय.

आमच्या शिवरायांना विकू नका!, सामनातून कुणाला इशारा?
Follow us on

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून इतिहासाच्या मोडतोडीवर भाष्य करण्यात आलंय. माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची अटक आणि सुटका यावरही आजच्या सामनात भाष्य करण्यात आलं आहे. तसंच जेम्स लेन्सचाही दाखला देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची (Chhatrapati Shivaji Maharaj History) मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्रात ‘जेम्स लेन्स’चे प्रकरण याआधी घडले आहे, पण अनेक देशी ‘जेम्स लेन्स’ या मातीत उपटले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका!, असं आजच्या सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील ‘विद्वान’ म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे. अशा संशोधकांना एका पोत्यात घालून हिंदी महासागरात बुडवायला हवे, तरच इतिहासाचे तेज धगधगते राहील!, असं म्हणत सामनातून निशाणा साधण्यात आला आहे.

इतिहास चिवडत बसू नका, नवा इतिहास निर्माण करा असा संदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच देत असत. सध्या महाराष्ट्रात इतिहासावर जे वादंग माजले आहे त्यासंदर्भात शिवसेनाप्रमुखांचे हे विचार मार्गदर्शक आहेत. ‘हर हर महादेव’ असा एक मराठी चित्रपट पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटात इतिहासाचे विकृत प्रदर्शन करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत असत्य कथन केले आहे, असे आक्षेप आहेत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी त्यावरुन या चित्रपटास विरोध केला आहे, असं म्हणत सध्या सुरु असलेले ऐतिहासिक सिनेमे आणि त्याला सुरु असलेल्या विरोधावर भाष्य करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात घुसून आंदोलन केल्याने त्यांना अटक व सुटका झाली. छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्मास आल्यामुळेच महाराष्ट्राला इतिहास आहे व बाकी राज्यांना फक्त भूगोल आहे. त्या इतिहासाची कोणत्याही पद्धतीची मोडतोड होता कामा नये, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.