महाराष्ट्र दिनी सामनातून नव्या लढाईची घोषणा; भाजप-अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: May 01, 2023 | 7:57 AM

Maharashtra Din 2023 : अमित शाह मुंबईत आले की मुंबईकरांच्या मनात 'चर्र' होतं, आता बलिदान द्यावं लागलं तरी बेहत्तर पण ही लढाई जिंकायचीच!, सामनातून भाजप-अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

महाराष्ट्र दिनी सामनातून नव्या लढाईची घोषणा; भाजप-अमित शाह यांच्यावर हल्लाबोल
Follow us on

मुंबई : आज महाराष्ट्र दिन आहे. यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र एकसंध राहण्यासाठी ज्या 105 जणांनी दिलेल्या बलिदानाची आठवणं केलं जात आहे. 105 हुतात्म्यांच्या कार्याला आठवलं जात आहे. अशातच आजच्या सामनातून महाराष्ट्र दिनावर भाष्य करण्यात आलं आहे. तर भाजप आणि विशेषत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली आहे आणि नव्या लढाईची घोषणा करण्यात आली आहे.

“मुंबईची रक्षणकर्ती म्हणून शिवसेना जन्माला आली. त्या शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसून भाजपने मुंबई तोडण्याचे पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईवरील शिवसेनेची पकड तोडायची. मग मराठी माणूस आपोआप नष्ट होईल व लगेच मुंबईचा घास गिळायचा हे एकंदरीत षड्यंत्र आहे. गृहमंत्री अमित शहा जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊल ठेवतात, त्या प्रत्येक वेळी मुंबईकरांच्या काळजात ‘चर्र’ होते. ते मुंबई तोडण्यासाठीच आले आहेत किंवा येत आहेत या भयाने तो व्याकूळ होतो, पण त्यातूनच त्याच्यातला मर्द मावळा उसळतो”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

“आजच्या महाराष्ट्र दिनी तमाम मराठी बांधवांनी मुंबईसाठी लढण्याचा निर्धार अधिक पक्का केला पाहिजे! महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी लढावे लागेल. 105 हुतात्मे झाले. उद्या त्यात भर पडली तरी चालेल, पण शिवरायांचा महाराष्ट्र मुंबईसह एक राहावा, यासाठी नवी लढाई लढावीच लागेल!”, असं म्हणत आजच्या सामनातून नव्या लढाईची घोषणा करण्यात आली आहे.

बेळगावसाठी 70 वर्षे आपला कंठशोष सुरू आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, पण 20 लाख मराठी बांधवांच्या आक्रोशाला न्यायालयातही किंमत नाही. ”सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी कधीच मनापासून प्रयत्न केले नाहीत व केंद्र सरकारनेही सतत ‘ठंडा करके खाओ’ हेच धोरण अवलंबिले,” असे एकदा जयंतराव टिळक म्हणाले होते ते खरेच आहे. बेळगाव सीमेबाहेर आहेच, पण आज मुंबई तरी महाराष्ट्रात राहील काय? असे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कसलीच खात्री वाटत नाही. मुंबईची रक्षणकर्ती म्हणून शिवसेना जन्माला आली. त्या शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसून भाजपने मुंबई तोडण्याचे पाऊल पुढे टाकले आहे, असं सामनात म्हण्यात आलं आहे.

105 हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्यांच्या त्यागातून, सेनापती बापट, एसेम जोशी, आचार्य अत्रे, कॉ. डांगे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या समर्थ नेत्यांच्या तेजस्वी लढय़ातून निर्माण झालेला हा महाराष्ट्र आहे. 1960 नंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीला महाराष्ट्र राज्य निर्माण झाले म्हणजे काय झाले? ते आकाशातून पडले की या देशाच्या भूमीतून एकदम वर आले? असा प्रश्न पडला असेल. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा पाहिला, ज्यांनी त्या काळात पोलिसांनी केलेला बेछूट गोळीबार अनुभवला, मोरारजी देसाईंपासून अनेकांनी मुंबई-महाराष्ट्राला मिळू नये म्हणून केलेली सर्व तऱ्हेची दडपशाही पाहिली, त्यांनी नव्या पिढीला महाराष्ट्र जन्माची कथा सांगितली पाहिजे, असं म्हणत सामनातून इतिहासातील घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.