वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही, आदित्य ठाकरेंवर बोलताना काय म्हणाले सचिन अहिर?

Sachin Ahir Aaditya Thackeray : सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. आता ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही, आदित्य ठाकरेंवर बोलताना काय म्हणाले सचिन अहिर?
Sachin Ahir Comment on Aaditya Thackeray
Image Credit source: Google
| Updated on: Jul 04, 2026 | 5:17 PM

काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांना तातडीने महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. आता ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अहिर यांनी आदित्य ठाकरेंबाबत मोठं विधान केले आहे.

आदित्य ठाकरेंसोबत बोलणं झालं होतं का?

वरळी मतदारसंघात किंवा आदित्य ठाकरेंसोबत सचिन अहिर हे नेहमी असायचे. मात्र पक्ष सोडताना तुमचं आदित्य ठाकरेंशी काय बोलणं झालं यावर बोलताना सचिन अहिर म्हणाले की, ‘मी त्यांना एसएमएस केला होता, कारण निर्णय एक दिवस आधी झाल्यामुळे त्यांना स्पष्टीकरण दिले नाही. मी राष्ट्रवादीतून आल्यानंतर ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती समाजसेवा करण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो त्यावेळी त्यांना विरोध करायचा की साथ द्यायची असा प्रश्न होता. त्यावेळी मी साथ देण्याचा निर्णय घेतला.’

आदित्य ठाकरे ठाकरेंना दोनदा निवडून आणण्यासाठी काम केलं – सचिन अहिर

सचिन अहिर यांनी सांगितले की, ‘आदित्य ठाकरे यांना वरळीतून दोनदा निवडून आणण्यासाठी मी आणि इतर लोकांनी काम केले. महानगरपालिकेमध्येही आम्ही सर्व नगरसेवकांना जी काही ताकद देता येईल ती ताकद देण्याचे काम केले. यामागे हेतू असा होता की, एखादं नेतृत्व घडत असताना त्याला आपण शेवटपर्यंत साथ द्यायला पाहिजे. दुसरी ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा आपण साथ देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी राजकीय दृष्टीकोणातून झेप घ्यायची असेल तर त्यासाठी मर्यादा होत्या. मलाही ते लक्षात येत होतं.’

पुढे बोलताना अहिर म्हणाले की, ‘राज्याच्या हितासाठी आणि माझ्यासोबत असलेल्या वर्गासाठी आणि समाजासाठी फक्त वरळीसाठी मर्यादित न राहता राज्यामध्ये आपण चांगली संघटना वाढवू शकतो, राज्यातील गोरगरिबांचे प्रश्न सोडवू शकतो. ही संधी ज्यावेळी मला मिळाली, त्यावेळी मी संधीचं सोनं करण्याचं काम केलं. मी देखील 2014 साली मंत्री राहिलो होतो, त्यानंतर माझी निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी होती, त्यावेळी मी सहकार्याची भूमिका घेतली.’

वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव नाही…

सचिन अहिर यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘आता कुणी सांगत असेल की वरळी आमचा बालेकिल्ला आहे, तर मी वरळीतून निवडून आलो होतो. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही आणि भविष्यकाळात ते वरळीकर ठरवतील. मी माझं राजकारण संकुचित वरळीपुरते मर्यादित न ठेवता, आता गल्लीमध्ये न राहता राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गरजूंना न्याय देण्याचा मानस माझा राहणार आहे.’

Follow Us