शरद पवारांचं आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करा, आम्ही पाठिंबा देऊ : सदाभाऊ खोत

| Updated on: Feb 02, 2021 | 6:12 PM

लोक माझे सांगती या शरद पवार यांच्या आत्मचरित्रात करार शेतीचा उल्लेख केला आहे. त्यांचं आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करावं, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

शरद पवारांचं आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करा, आम्ही पाठिंबा देऊ : सदाभाऊ खोत
Follow us on

बारामती : राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरु असलेल्या आंदोलनावरुन सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना आवाहन केलंय. शरद पवार यांचं आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करा, आम्ही पाठिंबा देऊ, असं आवाहन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलंय. सदाभाऊ खोत आज बारामती न्यायालयात एका प्रकरणाची साक्ष देण्यासाठी गेले होते.(Sadabhau Khot criticizes Sharad Pawar over Delhi farmers’ agitation)

2006 साली करार शेतीचा महाराष्ट्र सरकाने संमत केला. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची सुरुवात बारामतीपासून झाली. लोक माझे सांगती या शरद पवार यांच्या आत्मचरित्रात करार शेतीचा उल्लेख केला आहे. त्यांचं आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करावं, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

जाणते नेते शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचं प्रेम दाखवतात- खोत

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावा यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. त्यावेळच्या सरकारनं शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार केला. आंदोलकांवर गोळ्या चालवल्या. जे आज शेतकऱ्यांच्या नावानं गळा काढत आहेत. त्यांनी आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना काय वागणूक दिली ही तपासण्याची वेळ आली आहे. आज मात्र शेतकऱ्यांचे तारणहार आम्हीच आहोत असा अविर्भाव दाखवला जात आहे. जाणते नेते शेतकऱ्यांबाबत पुतन मावशीचं प्रेम दाखवत आहेत”, अशा शब्दात खोत यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधलाय.

‘दिल्लीच्या तख्तासाठी आंदोलन सुरु’

काही वर्षांपूर्वी शरद जोशी आणि राकेश टिकैत यांनी परमिट राज बंद व्हावं यासाठी दिल्लीत मोठं आंदोलन उभारलं होतं. मात्र त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हे आंदोलन मोडीत काढलं. आता जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते शेतकऱ्यांना मिळणारं स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं हे आंदोलन राहिलं नसून दिल्लीच्या तख्तावर कुणी बसावं, हा दृष्टीकोन ठेवूनच हे आंदोलन होत असल्याची टीका खोत यांनी केलीय.

सदाभाऊ, राजू शेट्टींची निर्दोष मुक्तता

2012 साली बारामतीत झालेल्या ऊस प्रश्नावरील आंदोलन प्रकरणातून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यासह 20 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. बारामतीत झालेल्या आंदोलनात ऊस गाड्यांचे टायर फोडणे, ट्रॅक्टरचे टाय जाळणे, ऊस वाहतूकदारांचे नुकसान करणे, आदी गुन्हे त्यांच्यावर होते.

संबंधित बातम्या :

समोरासमोर येऊनही बोलले नाहीत, सदाभाऊ म्हणाले नंतर बसू, राजू शेट्टी, म्हणतात बसण्याचा अर्थ वेगळा

सदाभाऊ खोत बारामती न्यायालयात साक्षीसाठी हजर, राजू शेट्टींच्या ‘टायमिंग’ने भेट टळली!

Sadabhau Khot criticizes Sharad Pawar over Delhi farmers’ agitation