Sadabhau Khot : ‘घट्ट मिठीतून तू का गं निघून गेलीस?’ बहीण रुक्मिणीच्या निधनानं सदाभाऊ खोत गहिवरले!

'भाऊ धाप वाढलीय तुम्ही लगेच दवाखान्याकडे या. मी तात्काळ दवाखान्याकडं धावत पळत गेलो. आणि तिच्या कडे गेलो असता माहीत झालं की मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेलेली होती.'

Sadabhau Khot : घट्ट मिठीतून तू का गं निघून गेलीस? बहीण रुक्मिणीच्या निधनानं सदाभाऊ खोत गहिवरले!
दुःखद...
Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 10, 2022 | 1:15 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत एक चटका लावून जाणारी बातमी समोर आली. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या बहिणीचं निधन झालंय. सदाभाऊ खोत यांना गुरुवारीच विधानपरिषदेसाठी (Vidhan Parishad) भाजपकडून अपक्ष उमेदवारी जाहीर झाली होती. अपक्ष म्हणून त्यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय. 20 जूनला ही निवडणूक होणार आहेत. पण त्याआधी सदाभाऊ खोत यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. बहिणीच्या निधनानं दुःखी झालेल्या सदाभाऊ खोत यांनी बहिणीच्या आठवणीमध्ये एक हृदयस्पर्शी फेसबुक पोस्ट (Facebook Post) लिहिली आहे. आपल्या बहिणीसोबतच्या आठवणींना उजाळा देतना आपल्या बहिणीच्या निधनानं झालेल्या दुःखालाही त्यांनी वाट मोकळी करुन दिलीय. गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत यांनी बहिणी रुक्मिणी यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही केली जाणार होती. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.

फेसबुक पोस्टमध्ये काय?

सदाभाऊ खोत आपल्या बहिणीच्या आठवणींना गहिवरुन गेलेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की,…

मरळनाथपूर या छोट्याशा गावामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही लहानाचे मोठे झालो. इवलसं गाव डोंगर कपारीमध्ये असणारी शेती. उन्हाळा आला की सगळं बोखाडमाळ डोळ्यासमोर पाहीला मिळायचं. रानामध्ये जनावरांच्या मागं आम्ही भावंड गेलो की पायामध्ये सड, बोराडी चा काटा आणि अनेक काटे कुटे घुसायचे. घरात आलं की काटा घुसलेल्या पायाला बिब्याचा नाहीतर गुळाचा चटका दिला जायचा. पाय बांधला जायचा. आणि दुसऱ्या दिवशी काटा काढला जायचा. काटा जरी काढलेला असला तरी कळ मारावी म्हणून बिब्याचा चटका दिलेला असायचा. सणावाराला कधीतरी पुरणपोळी खायला मिळायची. चपातीने तर कधी आम्हाला तोंड दाखवलच नव्हतं. काळी पडलेली हायब्रीड ज्वारीची भाकरी ही आमच्या ताटात असायची. भात कधीतरी नवसालाच असायचा. अशा सगळ्या गरिबीमध्ये हा चाललेला प्रपंचाचा गाडा. गाई म्हशीचं दूध दुभतं फक्त मात्र घरात भरपूर असायचं. दूध भाकरी खायचा एक वेगळाच गोडवा मनामध्ये राहायचा. तीन चुलते त्यांची मुलं असं नाही म्हटलं तरी आमचा सगळा पंधरा-सोळा माणसांचा खटाला होता.

घर मात्र एक लहानसं खुराडं होतं. गरिबीनं मोठं घर बांधायला सुद्धा उसंत दिलेली नव्हती. कालांतराने घरातली आम्ही बहिणी भावंडं मोठी झालो. राहायला मग आम्ही शेतामध्ये घर बांधायचा निर्णय घेतला. पालाच्या घरामध्ये काही दिवस राहिल्यानंतर दोन चुलते मुंबईला आले. मुंबईल कमावलेला पैसा जमवून दगड मातीच कौलारू घर शेतामध्ये उभं राहिलं. उभ्या राहिलेल्या घरामध्ये आम्ही बहिणी भावंड राह्यला लागलो. त्या घराशेजारी माळरानांवर आजूबाजूला कुणाचंही घर नव्हतं. एकमेवं घर होतं ते आमचं होतं. दिवस उजाडला कि आम्हाला हायसं वाटायचं. रात्री चोरा चिलटांचं भय असायचं. अशा ह्या भीतीच्या छायेखालीच आम्ही लहानाचे मोठे झालो.

पाहुणा पै आला तरच सोबत असायची. अशा दारिद्यात कधी भाजीला तेल आहे तर कधी चटणी नाही. कधी भाजीऐवजी ठेचा तर कधी लाल मिरचीची चटणी आणि बुक्का असं बेताचंच आमचं राहणीमान होतं. रानातल्या पालेभाज्या खाऊन आम्ही धडधाकट होतो.

ह्या गरिबीमध्ये कधी श्रीमंतीचं वारं सुद्धा कधी आम्ही पाहिलं नसल्यानं आम्ही बहिणी भावंडं आनंदाने एकत्र राहत होतो. ह्या दारिद्याचं ओझं घेऊन जगलो. ह्या दारिद्र्यामध्येच माझ्या बहिणीचं लग्न झालं.

4 जूनला तिच्या छातीमध्ये अचानक दुखू लागलं त्यावेळेस ती मुंबईलाच होती म्हणून तिला मुंबईतच एका छोट्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि तिला हृदयाचा आजार असल्याचं निदान झालं. मी कांदा परिषदेला नाशिकच्या दौऱ्यावर होतो. मला चुलत भावाचा फोन आला. कि रुक्मिणीची तब्येत बिघडली तर आता काय करावं. डॉक्टर म्हणतात कि इथं ऑपरेशन होत नाही. लगेच मी तिला के. ई. एम हॉस्पिटल मुंबईमध्ये घेऊन यायला सांगितलं आणि लगेच मी कार्यक्रम आटपून धावतपळत मुंबईला बहिणीजवळ आलो आणि तिला गुच्छ दिला आणि म्हणालो तुला लवकर बरं करायचं आहे. चेहऱ्यावर माझ्या बहिणीच्या हस खुललं. अन तसं बहिणीनं अंथरुणावर उठून माझ्या कंबरेला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर माझे डोळे पाणावले. हि वेड्या बहिणीची वेडी माया. आता वाट्लं हि लवकर बरी होईल. त्यानंतर सकाळी डॉक्टरांशी बोललो उद्याच्याला ऑपरेशनला घ्यायचा निर्णय झाला.

8 जून 2022 ला मी दुपारी कामानिमित्त बाहेर आलो आणि दुपारी मला भाच्याचा फोन आला. भाऊ धाप वाढलीय तुम्ही लगेच दवाखान्याकडे या. मी तात्काळ दवाखान्याकडं धावत पळत गेलो. आणि तिच्या कडे गेलो असता माहीत झालं की मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेलेली होती.