मुंबई: सध्या देशात दोन विचारधारा आहेत. एक सेक्युलर आणि दुसरी हिदुत्वाची. जेव्हा सरकार स्थापन करण्यात येत होते. तेव्हा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला. त्यात सर्व धर्मांना सोबत घेऊन जाण्याचं ठरलं. पण गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) सतत हिंदुत्वावर बोलत आहेत. तुमचं हिंदुत्व मोठं की आमचं हिंदुत्व मोठं असं भाजप (bjp) आणि शिवसेनेत सुरू आहे. त्यामुळे हे सरकार धर्म निरपेक्ष आहे की हिंदुत्ववादी आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, असं सांगतानाच समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू असीम आजमी हेच राज्यसभेसाठी (Rajyasabha Election) आघाडीला पाठिंबा द्यायचा की नाही हे ठरवतील, असं समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी सांगितलं. रईस शेख यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परब यांना सपाच्या मागण्यांचं लेखी निवेदन देऊन चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मात्र, आघाडीला पाठिंबा देण्याबाबत शेख यांनी थेट भाष्य न केल्याने समाजवादी पार्टी आघाडीला पाठिंबा देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अनिल परब माझे मित्रं आहेत. त्यांना नेहमी भेटतो. आता राज्यसभेची निवडणूक आहे म्हणून त्यांना भेटायला आलो नाही. मी परब यांना एक पत्र दिलं आहे. आमच्या पत्रात दोन मुद्दे आहेत. महाविकास आघाडीसाठी हे दोन मुद्दे आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी आहेत. किमान समान कार्यक्रमावर सरकारची स्थापना झाली. पण मुख्यमंत्री गेल्या दोन वर्षापासून हिंदुत्वाची भाषा करत आहे. त्यामुळे हे सरकार सेक्यूलर आहे की हिंदुत्वावर आहे, याचं स्पष्टीकरण आघाडीने करायचं आहे, असं रईस शेख यांनी सांगितलं.
अडीच वर्षात मायनॉरिटी कम्युनिटीसाठी काय केलं हे सुद्धा सरकारने सांगावं. हज कमिसशनचं काय झालं? मायनॉरिटीच्या फायनान्स कार्पोरेशनची स्थापना करण्यात आली नाही. हा लोकांचा मुद्दा आहे. यावर स्पष्टीकरण करा. मी ओपन भेटत आहे. आमच्या काही मागण्या नाही. आमच्या पत्राची दखल घ्या. महाराष्ट्राला उत्तर द्या, एवढीच आमची अपेक्षा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. माझे मुद्दे परब यांनी समजून घेतले. त्यांच्या वरिष्ठांशी ते चर्चा करतील. त्यानंतर तेच बोलतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लेखी स्वरुपात पत्रं दिलं आहे. हे मुद्दे सरकारपुढे ठेवले आहेत. सरकार सेक्युलर आहे की नाही हे स्पष्ट करा. माझ्यासाठी डेडलाईन नाही. ही डेडलाईन आता त्यांच्यासाठी आहे. आम्ही आघाडी सोबत आहोत. पण आमच्या प्रश्नावर उत्तर द्या. मतदानाबाबत अबू आजमींनी काही सांगितलं नाही. ते सांगतील तेच करू. ते आमचे नेते आहेत, असंही ते म्हणाले.
आम्ही घरातच राहत आहोत. आम्हाला कुणाची भीती नाही. त्यामुळे आम्हाला हॉटेलात जाण्याची गरज नाही. आघाडी बैठक आहे. आजमी त्या बैठकीला जाणार नाही असं वाटतं. लोकं आम्हाला भेटतात. पण आम्ही विचारधारेवर बोलतो. भाजपच्या विचारधारेशी आमचा संबंध नाही, असंही ते म्हणाले.