पुण्यात राहतोय की पाण्यात? पुण्यातील पूरस्थितीवरून ‘सामना’चा भाजपावर हल्लाबोल

सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. यावेळी पुण्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवरून भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

पुण्यात राहतोय की पाण्यात? पुण्यातील पूरस्थितीवरून सामनाचा भाजपावर हल्लाबोल
Image Credit source: TV9
| Updated on: Oct 22, 2022 | 8:30 AM

मुंबई : सामनाच्या  अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपावर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे. यावेळी पुण्यात (PUNE) निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवरून भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या पुणेकरांची स्थिती या आठवड्यातील धुवांधार पावसाने दयनीय करून टाकली. गेल्या वर्षीही अशाच पावसाने पुण्याची दुरवस्था केली होती. सोमवारी पुण्यात दोन तासांत सुमारे 125 मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसाने पुणे शहराची अक्षरश: वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले. सोमवारी रात्री जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे (Shiv sena) बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेत आहेत’, असा हल्लाबोल सामनामधून करण्यात आला आहे.

पावसाने पुण्याची दैना

पुढे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की,’आयटीची राजधानी, ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची दोन तासांत पडलेल्या 125 मिलीमीटर पावसाने दैना केली, ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या विनोदाने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रु वेशीला टांगली.

‘पुणे तेथे काय उणे’

‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या स्मार्ट सिटीचा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे’! असा घणाघात आजच्या सामनाच्या आग्रलेखातून करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा सामनामधून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. आता या टीकेला भाजपाकडून काय प्रत्युत्तर मिळते ते पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us