SambhajiRaje Chatrapati : संभाजीराजे छत्रपतींचं सर्व विधानसभा आमदारांना खुलं पत्र, राज्यसभा निवडणुकीसाठी सहकार्याचं आवाहन

| Updated on: May 17, 2022 | 6:07 PM

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आता संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व आमदारांना खुलं पत्र लिहिलं आहे.

SambhajiRaje Chatrapati : संभाजीराजे छत्रपतींचं सर्व विधानसभा आमदारांना खुलं पत्र, राज्यसभा निवडणुकीसाठी सहकार्याचं आवाहन
परप्रांतीय प्रियंका चतुर्वेंदींना संधी तर संभाजीराजेंना का नाही? राज्यसभेवरून मराठा समाज आक्रमक
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. यातील 5 जांपैकी भाजपच्या दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रत्येकी एक जागा निवडून येईल असं संख्याबळ आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आता संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व आमदारांना (Assembly MLA) खुलं पत्र लिहिलं आहे. ‘राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो’, असं संभाजीराजे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

संभाजीराजेंचं विधानसभा आमदारांना काय आवाहन?

आपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या 42 मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी काम केले

2007 पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र. या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे.

माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो.