मोदी-शाह दिल्लीत तर फडणवीस महाराष्ट्रात नवेच, ‘नया है वह’ वरुन संजय राऊतांचा पलटवार

| Updated on: Jul 13, 2020 | 3:00 PM

"तुमचीही वृत्तपत्रे आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी. बघूया ते मुलाखत देतात का आणि ते ही मुलाखत छापण्याची हिंमत दाखवतात का?" असे आव्हानही राऊतांनी दिले.

मोदी-शाह दिल्लीत तर फडणवीस महाराष्ट्रात नवेच, नया है वह वरुन संजय राऊतांचा पलटवार
Follow us on

मुंबई : नरेंद्र मोदी-अमित शाह हे दिल्लीत, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नवेच आहेत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते फडणवीसांना उत्तर दिले. ‘नया है वह’ असं म्हणत फडणवीसांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. (Sanjay Raut answers Devendra Fadnavis Criticism on Aditya Thackeray)

“राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वैयक्तिक आहेत. त्यामुळे ते मिटतील, सरकारला कोणताही धोका पोहोचणार नाही.” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. भगवान शंकराशी निगडीत कमळाच्या फुलाचे ‘ऑपरेशन कमळ’ करुन स्थिर सरकार पडण्याची फार चुकीची पद्धत सुरु आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत करताना भाजपवर टीका केली.

“महाराष्ट्रात नंबरच लावणार आहेत न? मग आम्हालाही आमच्या पद्धतीने नंबर लावता येईल. हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. ठाकरे सरकार सध्या ऑपरेशन कोरोनामध्ये व्यस्त आहेत. देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांनी राजकारण केलेच पाहिजे, त्यांना भरपूर वेळ देऊ, खेळत बसा” असा टोला राऊतांनी लगावला.

हेही वाचा : “मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही, नया है वह” आदित्य ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा

‘सामना’चा खप वाढविण्यासाठी शरद पवार यांची मुलाखत घेतल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर उत्तर देताना, ‘सामना’ काय आहे, हे चंद्रकांत पाटील यांनी सांगावं अशी वेळ आलेली नाही, असा खरपूस समाचार राऊत यांनी घेतला. एखाद्या नेत्याला ठरवून टार्गेट करणे हा सामनाचा अजेंडा कधीच नव्हता, आणि नसेल, असे संजय राऊत म्हणाले.

“तुमचीही वृत्तपत्रे आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी. बघूया ते मुलाखत देतात का आणि ते ही मुलाखत छापण्याची हिंमत दाखवतात का?” असे आव्हानही राऊतांनी दिले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“अनेक एनजीओ कोरोना संकटात काम करत आहेत, याचा अर्थ धारावीतील कामाचे श्रेय कोणी घेऊ नये, मुख्यमंत्री धारावीतील परिस्थितीकडे स्वतः लक्ष ठेऊन आहेत.

फडणवीसही नवेच

“देवेंद्र फडणवीसही नवेच आहेत, ते जुने कुठे झाले आहेत. तरुणांना संधी द्यावी, या मताचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत. अमित शाहसुद्धा दिल्लीच्या राजकारणात नवीनच आहेत. मात्र त्यांनी गृहमंत्री म्हणून दिल्लीत उत्तम काम केले आहे. मोदीही दिल्लीत नवे होते, त्यांनी उत्तम काम केले, आम्ही कौतुक करतोच की. त्यांना आम्ही नया है वह म्हटलं का? आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून चांगले काम करत आहेत” अशा शब्दात राऊतांनी पलटवार केला.

फडणवीस काय म्हणाले होते?

“नया है वह! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवत आहेत. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतंच, असं नाही. त्यामुळे ठिक आहे. ते नवीन आहेत, बोलत आहेत. मला असं वाटतं, माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काही प्रतिक्रियादेखील देऊ नये”, अशी टीप्पणी फडणवीसांनी केली.

उद्धव ठाकरेंचीही ‘सामना’मध्ये मुलाखत

पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही ‘सामना’मध्ये मुलाखत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या मुलाखती लवकरच घेणार आहोत, असं ते म्हणाले.

पाहा व्हिडिओ :


(Sanjay Raut answers Devendra Fadnavis Criticism on Aditya Thackeray)