बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण? राज ठाकरे की एकनाथ शिंदे; संजय राऊत यांचे उत्तर काय?

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार कोण अशी चर्चा सुरू असतांनाच संजय राऊत यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर राऊत यांनी स्पष्टच उत्तर दिले आहे.

बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण? राज ठाकरे की एकनाथ शिंदे; संजय राऊत यांचे उत्तर काय?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 16, 2023 | 12:43 PM

मुंबई : शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी शिवसेना ( Shivsena )  नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. गावखेड्यात शिवसेनेच्या शाखा सुरू करत राज्यभर शिवसेना पक्षाची बांधणी केली होती. हळूहळू राज्यात सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, महापौर, आमदार आणि खासदार निवडून येऊ लागले होते. त्यामुळे पक्षाची ताकद वाढत गेली आणि पक्ष राज्यातील एक महत्वाचा पक्ष बनला होता. केंद्रातही खासदार निवडून जाऊ लागल्याने पक्षाची ताकद वाढत गेली. प्रादेशिक पक्ष असला तरी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे पक्षाची संपूर्ण देशात ओळख निर्माण झाली होती.

बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा कोण चालवणार अशा चर्चा राज्यभर सुरू असतांना राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांचा शिवसेनेशी कुठलाही संपर्क राहिला नव्हता.

अशातच राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतलेली असतांना बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेत उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या असं सांगत तेच राजकीय वारसदार असल्याचे एक प्रकारे सांगून टाकलं होतं. अशातच आता शिवसेनेत मोठी फुट पडली.

एकनाथ शिंदे यांनी बंड करत असतांना बाळसाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही बाहेर पडत असल्याचे म्हंटले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार अशी चर्चा सुरू आहे. त्याचाच धागा पकडून टीव्ही 9 वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

संजय राऊत यांना त्या मुलाखतीच्या दरम्यान दोन फोटो दाखवण्यात आले होते. त्यामध्ये संजय राऊत यांना एक फोटो एकनाथ शिंदे आणि एक फोटो राज ठाकरे यांचा फोटो दाखवत यांच्यापैकी बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार कोण असा सवाल विचारण्यात आला होता.

त्याच प्रश्नावर संजय राऊत यांनी स्पष्टच उत्तर दिले आहे. दोघेही नाही, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, जे बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेले ते बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार होऊच शकत नाही असे म्हंटले आहे. त्यानंतर दोघांपैकी चांगला नेता कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

त्यावेळी संजय राऊत यांनी उत्तर देत थेट एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. दोघांमध्ये नेतृत्वगुण नाही असे म्हंटले होते. मात्र, एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही राजकीय वारसा पुढे घेऊन जात असल्याचे अनेकदा म्हंटले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्यात बाळसाहेब ठाकरे यांचे राजकीय गुण आहेत असे अनेकदा महाराष्ट्रात बोललं जातं.

Follow Us