मोदी शिवराय आणि अमित शाह तानाजींच्या रुपात, आता हंगामा करणारे गप्प का? : संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे देशातील राजकारण तापले असतानाच सोशल मीडियावर नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी माहाराजांच्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याजागी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो लावले गेले आहेत.

मोदी शिवराय आणि अमित शाह तानाजींच्या रुपात, आता हंगामा करणारे गप्प का? : संजय राऊत
Chetan Patil | Edited By: | Updated on: Jan 21, 2020 | 6:22 PM

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या फोटोचा वापर निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये केला जात आहे. त्यावर आता महाराष्ट्रातील प्रमुख नेते, ज्यांना असं वाटतं की छत्रपतींवर बोलण्याचा त्यांनाच अधिकार आहेत ते गप्प का बसले आहेत? मी त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे”, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे देशातील राजकारण तापले असतानाच सोशल मीडियावर नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर आधारीत ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटातील आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी माहाराजांच्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याजागी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो लावले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणी नाव न घेता भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

“छत्रपती शिवाजी आणि सुभेदार तानाजी यांच्या चेहऱ्यावर राजकीय नेत्यांचे फोटो लावून प्रचार रॅलीत फिरवले जात आहेत. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काही लोकांनी हंगामा केला होता. त्यासर्वांना मी ते फोटो पाठवले आहेत. आता मी त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे. काही लोकांनी सातारा, सांगली बंद केले. काही लोकांनी मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे, जगाचे युगपुरुष आहेत. आमचे ते दैवत आहेत. आमचा जीव गेला तरी चालेल मात्र छत्रपतींचा अपमान आम्हाला चालणार नाही. जर कुणी अपमान करत असेल आणि विनाकरण आम्हाला प्रश्न विचारत असतील तर आज ते का शांत बसले आहेत?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

महापुरुषांच्या फोटोंचा वापर प्रचाररॅलींमध्ये केला जात आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता “जे प्रमुख लोक महाराष्ट्रात आहेत, ज्यांना असं वाटतं की छत्रपतींविषयी त्यांनाच बोलण्याचा अधिकार आहे, गेल्या चार दिवसांपूर्वी ज्यांनी तावातावाणे शिवसेनेविरोधात वक्तव्य केली होती, अशा लोकांना हा प्रश्न विचारला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांना समन्वय समिती संदर्भात प्रश्न विचारला असता “जेव्हा आघाडी, फ्रंट, यूपीए, एनडीए अशाप्रकारे सरकार बनते तेव्हा समन्वय समितीची गरज असते. त्यामुळे सरकारला काम करायला सोपं जातं. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत. कोणी धर्मनिरपेक्ष तर कोणी हिंदुत्ववादी आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम सरकारसाठी बनवलं, ते व्यवस्थित होतात की नाही हे समिती ठरवते, विवादीत मुद्दे ही समिती हाताळते”, असे संजय राऊत म्हणाले.

Follow Us