भय अन् भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे शिवसेना-राष्ट्रवादी फुटली…, संजय राऊत यांचा दावा

हिंदीची सक्ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर लादत आहेत. त्यांनी मराठी शाळा अधिक चांगल्या करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत, असा आरोप शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी केला.

भय अन् भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे शिवसेना-राष्ट्रवादी फुटली..., संजय राऊत यांचा दावा
संजय राऊत
Image Credit source: TV9 Marathi
Jitendra Zavar | Updated on: Jun 23, 2025 | 10:25 AM

शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर वक्तव्य केले आहे. दोन्ही पक्षांतील आमदारांना भय दाखवून फोडण्यात आले. तसेच प्रचंड पैशांचा वापर झाला. भय आणि भ्रष्टाचार यामुळे हे दोन्ही पक्ष फुटले, असे संजय राऊत यांनी म्हटले.

भास्कर जाधव यांच्या नाराजीवर संजय राऊत म्हणाले, भास्कर जाधव आमचे सहकारी आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या आहेत. त्यांची भूमिका मी माध्यमांमधून वाचली. त्यांच्या मनात काय वेदना आहे, ते आम्ही समजून घेऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले.

आता निष्ठावंतांची शिवसेना

शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीनंतर पक्षांतील बंड रोखले. तसेच २०२२ मधील शिवसेनेतील बंड रोखता आले असते, असे भास्कर जाधव म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, शरद पवार यांनी त्यावेळी बंड थांबवले. परंतु त्यानंतर चार वर्षांत अजित पवार गेलेच ना. उद्धव ठाकरे यांनीही बंड रोखण्याचा प्रयत्न केला. अनेक आमदारांशी चर्चा केली. परंतु काही जण घाबरुन गेले. भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील आणि शिवसेनेमधील आमदार गेले. उदाहरण पाहिल्यावर त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्या खात्यात ४० ते ५० कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे अटक होईल, अशी भीती गुलाबराव पाटील यांना वाटली होती. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत निष्ठावंत आहेत.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री योग्य वेळी करणार असल्याचे म्हणाले होते. त्यावर राऊत म्हणाले, खरं तर मुख्यमंत्री बोलबच्चन आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या एक लाख झाल्यावर ते कर्जमाफी करणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

फडणवीस यांच्यावर टीका

हिंदीला राज्यात तिसरी भाषा करण्याची सक्ती केली आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, हिंदीची सक्ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर लादत आहेत. त्यांनी मराठी शाळा अधिक चांगल्या करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. हिंदी ही तिसरी भाषा म्हणून आम्हाला गरज नाही. अनेक लेखक, कवी, अभिनेते यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आपले पुरस्कार परत करत आहेत. त्यांचे मी अभिनंदन करत आहे. मनसेकडून या विषयावर आंदोलन सुरु झाले आहे. शिवसेना उबाठा हा राज्यात प्रमुख पक्ष आहे. आम्ही विधानसभेच्या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला जाब विचारु, असे राऊत म्हणाले.

Follow Us