तिकीट नाकारल्याचा वचपा, बंडखोर मंत्र्याकडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव

| Updated on: Dec 24, 2019 | 10:53 AM

तिकीटवाटपावेळी तिष्ठत ठेवल्याने बंडखोरी केलेल्या शरयू रॉय यांनी झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना हरवलं.

तिकीट नाकारल्याचा वचपा, बंडखोर मंत्र्याकडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव
Follow us on

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव आला. भाजपने महाराष्ट्रापाठोपाठ आणखी एक राज्य हातातून गमावल्याइतकीच चर्चा होती मुख्यमंत्री रघुवर दास यांना बसलेल्या पराभवाच्या धक्क्याची. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच होम ग्राऊण्डवर पराभवाची धूळ चारणारा दुसरा-तिसरा कोणी नसून भाजपचा माजी मंत्री आहे. तिकीटवाटपावेळी तिष्ठत ठेवल्याने बंडखोरी केलेल्या शरयू रॉय यांनी रघुवर दास यांना (Saryu Roy Beats Jharkhand CM) हरवलं.

शरयू रॉय यांनी जवळपास 15 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत रघुवर दास यांना पराभूत केलं. 1995 पासून सलग पाच वेळा आमदार राहिलेल्या दास यांना शरयू रॉय यांनी जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात हरवलं. 73 हजार 332 मतं मिळवत शरयू रॉय विजयी झाले. दास दुसऱ्या, तर काँग्रेस उमेदवार गौरव वल्लभ तिसऱ्या क्रमांकावर होता.

शरयू रॉय हे शेजारच्याच जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून दोन वेळा आमदार होते. उमेदवार यादी जाहीर करताना रॉय यांना भाजपने अखेरपर्यंत वेटिंग लिस्टवर ठेवलं होतं. अखेर ‘जमशेदपूर पश्चिम’मधून देवेंद्र सिंह यांना भाजपने तिकीट दिलं आणि रॉय यांचा संयम सुटला.

हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्ये भाजपचं काय चुकलं?

‘मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना याबाबत विचारणा केली होती. त्यांनी मला पायउतार होण्यास सांगितलं असतं, तर मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास तयार होतो. पण त्यांनी अशा प्रकारची वागणूक देऊन माझा अवमान केला’ अशा भावना शरयू रॉय यांनी व्यक्त केल्या.

शरयू रॉय यांनी जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल करत, रॉय यांनी त्यांच्यावर मतदारांमध्ये दहशत पसरवण्याचा आरोपही केला होता.

‘मी यूपीएसोबतही नाही, आणि एनडीए सोबतही नाही. जनतेने मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे. त्यामुळे सदनात मी स्वतंत्र भूमिका बजावेन. भ्रष्टाचारविरोधात आणि पर्यावरण हक्कांसाठी मी काम करेन’ अशी ग्वाही शरयू रॉय यांनी दिली.

एकीकडे, महाराष्ट्रात तिकीट नाकारलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही आपली खदखद मांडली आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, सरदार तारासिंह, राज पुरोहित यासारख्या माजी आमदारांनी तिकीट नाकारल्याने झालेली घुसमट कधी ना कधी व्यक्त केली आहे. या नाराजीचा फटका भाजपला महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्ये बसल्याचं दिसत आहे. Saryu Roy Beats Jharkhand CM