विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता 10वी, 12वी परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा, भाजपची मागणी

| Updated on: May 24, 2021 | 6:27 PM

बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी उपाध्ये यांनी सोमवारी केली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता 10वी, 12वी परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा, भाजपची मागणी
10 वी, 12 वी परीक्षेवरुन केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका
Follow us on

मुंबई : राज्यात 10 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि परीक्षा बोर्डांना काही सवालही केलेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी अशाप्रकारे खेळ योग्य नसल्याचं मत उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलं आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय. कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Keshav Upadhyay criticizes Mahavikas Aghadi government On 10th and 12th exams)

कोरोना साथीमुळे राज्यात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, हे जरी खरे असले तरी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे दीर्घकालीन नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे. उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतरही राज्य सरकारने दहावी, बारावी परीक्षांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासात कोकणातला वादळ दौरा आटोपला त्या मुख्यमंत्र्यांना या परिक्षांचे महत्त्व आहे की नाही हा ही प्रश्न आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय.

व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचे काय?

त्याचबरोबर तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवले आणि राज्यात सरकार स्थापन केले. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही तेव्हा राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. जर राज्य सरकार परिक्षा घेणार नसेल तर पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे याबाबतची स्पष्टता अजुनही सरकारने केलेली नाही. परीक्षा न घेण्याचा पर्याय सरकार निवडणार असेल ज्या-ज्या ठिकाणी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातात त्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचे काय? सरकारच्या या वेळखाऊ, धोरण लकव्यामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याचे भान या सरकारने ठेवावे, असंही उपाध्ये यांनी म्हटलंय.

मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाचे प्रश्न उपस्थित

तुम्ही 12वीची परीक्षा घेता मग तुम्ही 10 वीची परीक्षा का घेत नाहीत? असा प्रश्नही मुंबई उच्च न्यायालयाने विचारलाय. त्याचबरोबर सर्व बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिक्षण तज्ज्ञांशी बोलून प्रतिज्ञापत्र सादर करावं, असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश देताना सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केलीय. प्रत्येक वर्षी आपण विद्यार्थ्यांना प्रमोट करु शकत नाहीत. आपण शैक्षणिक दृष्ट्या मुलांचं नुकसान करु शकत नाहीत, असंही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय.

न्यायालयाचे परीक्षामंडळाला परखड प्रश्न

>> 12वी परीक्षा घेता येतात तर 10वी परीक्षा का नाही ?
>> महाराष्ट्राची 10वी परीक्षान घेऊन शैक्षणिक भाविष्य का खराब करता ?
>> अंतर्गत परीक्षा न झालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना फुगवट्याच्या गुणांच्या आधारे विद्यार्थी कसे उत्तीर्ण करणार?
>> 10वी परीक्षा न घेता विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमास कसे प्रवेश देणार ?
>> महाराष्ट्र शासनाने 10वी परीक्षा रद्दचा कोणताही गांभिर्याने विचार केलेला नाही असे का ?

संबंधित बातम्या :

CBSE 10th Exam 2021 Cancelled:दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट कसं करणार? मिळालेले मार्क मान्य नसल्यास काय? शिक्षणमंत्री काय म्हणाले?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लॅन, कोणत्या उपाययोजनांचा समावेश?