MNS: शेवटी यातही पवार आलेच ! “ब्रिज” चे निर्माते, सुज्ञास अधिक सांगणे न लगे, गजानन काळेंकडून फोटो ट्विट

| Updated on: May 24, 2022 | 9:07 AM

ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही

MNS: शेवटी यातही पवार आलेच ! ब्रिज चे निर्माते, सुज्ञास अधिक सांगणे न लगे, गजानन काळेंकडून फोटो ट्विट
Image Credit source: twitter
Follow us on

खुद्द बृजभूषणसिंह यांनी आपण भाजपच्याच सांगण्यावरुन राज ठाकरेंचा (Raj Thackeray) विरोध करत असल्याचं जाहीर केलं असलं तरी मनसेला मात्र तसं वाटत नाहीय. नसतं तर मनसेचे (MNS) प्रवक्ते गजानन काळे यांनी जो फोटो ट्विट केलाय तो केला असता का? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला. त्यानंतर तिथले भाजपचे स्थानिक खासदार बृजभूषणसिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरेंना जाहीर विरोध करायला सुरुवात केली. हा विरोध एवढा टोकाला गेला की शेवटी राज ठाकरेंनी दौरा तुर्तास रद्द करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर पुण्यात राज ठाकरेंची सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी हा एक सापळा असून त्याचे अनेक पापुद्रे असल्याचं जाहीर केलं. तेव्हापासून राज ठाकरेंच्याविरोधात सापळा कोण रचतंय याची चर्चा सुरु झाली. विशेष म्हणजे हा सापळा भाजपाचेच नेते रचतायत हे राजनी स्पष्ट संकेत देत सांगितलं. पण कदाचित गजानन काळेंना ते पटलेलं दिसत नाहीय. त्यांनी थेट ह्या ब्रिजचे निर्माते शरद पवार, सुप्रिया सुळे असल्याचं ट्विट केलंय.


काय आहे गजानन काळेंच्या ट्विटमध्ये?

गजानन काळेंनी तीन फोटो ट्विट केलेत. ह्या तीनही फोटोत बृजभूषणसिंह यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार दिसतायत. मावळमधल्या एका कुस्तीच्या कार्यक्रमातले हे फोटो आहेत. ते नेमके कधीचे आहेत हे स्पष्ट होत नाही. पण तीनही फोटोत एक समानता म्हणजे बृजभूषण यांच्यासोबत पवार, सुप्रियांचा फोटो. त्यावर गजानन काळेंनी “ब्रिज” चेनिर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे …( फोटो झूम करून पाहावा…) असं लिहिलं आहे. काळेंच्या सुचनेनुसार फोटो झूम करुन पाहिला तरी बृजभूषण आणि पवार हेच दिसतात. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्याविरोधात सापळा ‘ब्रिज’ चा
सापळा रचणारे शरद पवारच असल्याचा आरोप काळेंनी केलाय.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

पुण्यात मी अयोध्येला जाणार असल्याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मी पाहत होतो. काय चाललं नेमकं. मला मुंबईतून माहिती मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. हा सगळा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण आडकून पडू नये. म्हणून अयोध्येला जायचं नव्हतं
या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते.

मी हट्टाने अयोध्येला गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक, हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही