आघाडीचं नेतृत्व करणार का, शरद पवार हसत म्हणाले, फार वर्षे पवारांनी असे उद्योग केलेत!

| Updated on: Jun 25, 2021 | 5:29 PM

नव्या आघाडीचं शरद पवार नेतृत्व करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी फार वर्षे असले उद्योग केल्याचं हसत सांगितलं.

आघाडीचं नेतृत्व करणार का, शरद पवार हसत म्हणाले, फार वर्षे पवारांनी असे उद्योग केलेत!
sharad pawar
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपविरोधात देशात होऊ पाहणाऱ्या आघाडीवर दिलखुलासपणे भाष्य केलंय. या नव्या आघाडीचं शरद पवार नेतृत्व करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी फार वर्षे असले उद्योग केल्याचं हसत सांगितलं. तसेच या आघाडीचं सूत्र सामूहिक नेतृत्व असेल असं स्पष्ट केलं. ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते (Sharad Pawar comment on leadership of front against BJP in India).

शरद पवार म्हणाले, “आघाडी म्हणून आम्ही आत्ता बसलो नाही, पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर ती काँग्रेसला बरोबर घेऊनच करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. मी त्या बैठकीतही ते मांडलं. आघाडीचा चेहरा कोण असावं यावर सध्या आम्ही चर्चा केलेली नाही. पण मला वाटतं सामूहिक नेतृत्व हे सूत्र पुढं ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल.”

“लोकइच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची”

आघाडीचं सामूहिक नेतृत्व शरद पवार करतील असा सूर असल्याचं बोलल्यानंतर शरद पवार म्हणाले, “शरद पवार यांनी फार वर्षे असले उद्योग केले आहेत. त्यामुळे सध्या हे नको. त्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, त्यांना शक्ती देणं, त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हीच माझी भूमिका असेल. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनतेला काही पर्याय द्यावा अशी लोकांमध्ये भावना आहे. ही लोकइच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. ती जबाबदारी आम्हाला निश्चित पूर्ण करावी लागेल.”

मराठा आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका घ्यावी

“मराठा आरक्षणाच्या खोलात गेलो नाही, राज्य सरकारची चर्चा सुरु आहे, त्यातून मार्ग निघावा, मात्र ही अस्वस्थता दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्राने भूमिका घ्यावी, जी मागणी आहे सुप्रीम कोर्टाने हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे असं सांगितलं आहे, त्यामुळे केंद्राने भूमिका घ्यायला हवी,” असं मत व्यक्त करत शरद पवार यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणावर आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली.

शरद पवार यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावरही भूमिका मांडली, ते म्हणाले, “ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला होता, सुप्रीम कोर्टाने रद्द केला. अधिकार कायम राहावा ही राज्याची भूमिका, त्यातून लवकर काही बाहेर पडावं. हा प्रश्न मराठवाडा, प महाराष्ट्र आणि कोकणातला आहे. विदर्भातील तितका विषय नाही. पण उर्वरित भागाच्या ओबीसी घटकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हा राज्य सरकारच्या प्रयत्नाचा भाग आहे, त्याचा लवकर निकाल लागावा अशी अपेक्षा आहे.”

दोन दिवसांच्या अधिवेशावर भाष्य

लोकसभेत जे सत्र घेतलं, त्यावेळी बसायला आम्ही पाच लोकं होतो तिथे एकजण बसतो, कोरोनामुळे काही गोष्टी इच्छा नसताना कराव्या लागतात, असं दोन दिवसाच्या अधिवेशनाबाबत शरद पवार म्हणाले. कोरोना स्थिती दूर झाल्यानंतर हे चित्र बदलेलं दिसेल, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीची छापेमारी, शरद पवार म्हणतात, आम्हाला यत्किंचितही चिंता नाही!

भाजपाविरोधात राहुल गांधी-शरद पवारांनी एकत्र यावं, काँग्रेस वर्किंग कमिटीही आता समर्थनार्थ

महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबाबत पवारांच्या मनात शंका नाही, पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं ट्वीट

व्हिडीओ पाहा :

Sharad Pawar comment on leadership of front against BJP in India