राज्यसभेसाठी फक्त शरद पवारांचा उमेदवारी अर्ज, काँग्रेसच्या भूमिकेमुळे फौजिया खान वेटिंगवर

| Updated on: Mar 11, 2020 | 3:47 PM

काँग्रेस राज्यसभेतील महाविकास आघाडीच्या चौथ्या जागेसाठी आग्रही असल्यामुळे समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे. Sharad Pawar Rajyasabha Nomination

राज्यसभेसाठी फक्त शरद पवारांचा उमेदवारी अर्ज, काँग्रेसच्या भूमिकेमुळे फौजिया खान वेटिंगवर
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थितीत पवारांनी अर्ज भरला. मात्र काँग्रेस चौथ्या जागेसाठी अजूनही आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान तूर्तास ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहेत. (Sharad Pawar Rajyasabha Nomination)

राज्यसभेच्या चौथ्या जागेबाबत समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. काँग्रेस राज्यसभेतील महाविकास आघाडीच्या चौथ्या जागेसाठी आग्रही असल्यामुळे बैठकीत यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यासोबतच शिवसेनेच्या उमेदवाराचा सस्पेन्सही कायम आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचं बोललं जात होतं.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली असून आज भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची घोषणाही आज होणार आहे. भाजपकडून एकनाथ खडसे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित मानलं जात असलं, तरी अधिकृत उमेदवारांची नावं गुलदस्त्यातच आहेत.

राज्यसभेवर शिवसेनेतून कोण? इथे वाचा : राज्यसभेसाठी शिवसेनेतील जुनेजाणते शर्यतीत, प्रियंका चतुर्वेदीही इच्छुक

दरम्यान, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले उद्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. विधानभवनात जाऊन आठवले अर्ज दाखल करतील.

शिवसेनेतही राज्यसभा उमेदवारीसाठी तिरंगी चुरस पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची नावं चर्चेत आहेत. परंतु माजी मंत्री दिवाकर रावते राज्यसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जातात.

महाविकास आघाडीतील चौथ्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने फौजिया खान यांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही काँग्रेस सतीश चतुर्वेदींच्या उमेदवारीसाठी आग्रही होतं. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर तणाव निवळल्याचं चित्र होतं. परंतु अद्यापही तिढा सुटलेला दिसत नाही.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

Sharad Pawar Rajyasabha Nomination