Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..
Priyanka Gandhi : हे आंदोलन पेटल्यानंतर आता काँग्रेस मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली आहे. लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अन्य नेत्यांनी काल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सोमवारी सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरलं. मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी संसदेच्या दिशेने निघाले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडपा झाल्या. काही आंदोलक जखमी झाले. जवळपास 118 पोलीसही जखमी झाले. आंदोलकांवरील पोलीस कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंदोलनाला समर्थन वाढलं आहे. समाजातील विविध सेलिब्रिटी आंदोलकांना पाठिंबा देत आहेत. लोकांच्या मनात पोलीस कारवाईबद्दल एकप्रकारची चीड आहे. विद्यार्थ्यांवर असा लाठीमार करण्याची गरज नव्हती, त्यासाठी चहूबाजूंनी मोदी सरकारवर टीका होतेय.
हे आंदोलन पेटल्यानंतर आता काँग्रेस मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली आहे. लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अन्य नेत्यांनी काल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. पोलिसांना राहुल गांधींना तिथून हटवावं लागलं. जवळपास तीन तास प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात होते. आज काँग्रेस नेते निषेध म्हणून संसदेत काळे कपडे घालून आले आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप काय?
दरम्यान काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गे आज संसदेत प्रवेश करत असताना मीडियाशी बोलले. “हे लोकशाही सरकार नाही. हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. नियमांतर्गत जे चालतात, त्यांना सुद्धा त्रास दिला जातो. भाजपं, आरएसएस स्वयंसेवक यामध्ये काम करतात. विद्यार्थी, काँग्रेस नेत्यांना घाबरवण्याचं काम अप्रत्यक्षपणे भाजपकडून सुरु आहे” असा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. “विद्यार्थ्यांना काही समस्या आहेत. ते म्हणतायत आमच्याशी बोला. सिस्टिम मोडली आहे, ती बदला अशी मुलांची मागणी आहे. ज्यांची मुलं आहेत, कुठल्या वर्गात, इयत्तेत आहेत, परीक्षेच्यावेळी काय स्थिती असते, विचारा त्यांना” असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
राहुल गांधी यांच्या काय मागण्या?
“आम्हाला धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांचा राजीनामा हवा आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांवर ज्या केसेस आहेत, त्या मागे घ्याव्यात” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. “लोकसभेचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझी मागणी आहे की, उद्या लोकसभा आणि राज्यसभेत या विषयावर चर्चा व्हावी. आम्हाला आमचा मुद्दा मांडू द्यावा. तुमच्या सरकारने, गृहमंत्र्यांनी जे केलं, त्यासाठी तुम्ही देशांच्या मुलाची माफी मागा. लवकरात लवकर परीक्षा व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा” अशा मागण्या राहुल गांधी यांनी केल्या.
