पावसातील भाषण ते शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाबाबत, शरद पवारांची रोखठोक भूमिका

| Updated on: Oct 25, 2019 | 1:40 PM

आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार (Sharad pawar on alliance with shivsena) नाही, असं आज (25 ऑक्टोबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

पावसातील भाषण ते शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाबाबत, शरद पवारांची रोखठोक भूमिका
Follow us on

बारामती : आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार (Sharad pawar on alliance with shivsena) नाही, असं आज (25 ऑक्टोबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठं यश (Sharad pawar on alliance with shivsena) मिळवलं आहे. एकट्या राष्ट्रवादीने 54 जागांवर विजय मिळवला आहे.

“आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यांच्यासोबत जाण्याचा काही संबंध नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कायम एकत्र राहील. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडू. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सोडवू”, असं शरद पवार यांनी सांगितले.

काल (24 ऑक्टोबर) लागलेल्या निकालामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. शिवसेना जर राष्ट्रवादीसोबत आली तर त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल, असं म्हटलं जात आहे. पण शरद पवार यांनी या चर्चेला पूर्ण विराम लगावला आहे.

छत्रपतींच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवल्याने उदयनराजेंचा पराभव

“छत्रपतींच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवल्याने उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला. गादीची प्रतिष्ठ ठेवली नाही हे लोकांना आवडले नाही, म्हणून निकाल त्यांच्याविरोधात लागला”, असं शरद पवार यांनी सांगितले.

पंकजा मुंडेंवर पवारांची टीका

“ज्यावेळी आपल्याकडे काही कामं दाखवायला नसतात, त्यावेळी डोळ्यात पाणी आणायचे काम लोक करतात. पण लोकांना आता हे आवडत नाही, भावनिक वातावरण तयार करुन यंदा काही फायदा झालेला नाही”, अशी टीका शरद पवारांनी पंकजा मुंडेंचे नाव न घेता केली.

पावसात दिलेल्या भाषणाचा राजकीय दृष्या फायदा 

“मी भाषण देण्यासाठी उभा राहिलो. तेव्हा जोरात पाऊस सुरु झाला. पण माझे भाषण ऐकण्यासाठी आलेले लोकं डोक्यावर छत्रीप्रमाणे खुर्च्या घेऊन उभे होते. त्यामुळे मी पण भाषण देत राहिलो. त्यावेळी मी बोललो ते लोकांना भावले. ते फक्त सातारा नाही तर महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी मी ते बोलत होतो. त्याचा फायदा राजकीय दृष्टीने आम्हाला झाला”, असं पवार म्हणाले.

370 चा प्रचार पण जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष

“370 कलम हटवले हे महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. हे कलम घटनेतून काढूनही टाकण्यात आले. पण ते झाले आता गेले, झालेल्या गोष्टीवर किती दिवस बोलणार. पण भाजपने मात्र सतत 370 कलम काढल्याचा प्रचार केला. त्यामुळे ते हास्यास्पद वाटू लागले. लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने भाजपला अपयश आलं आहे”, असंही शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रात नवी फळी तयार करणार

“आम्ही आता नवीन महाराष्ट्राची फळी तयार करायचा प्रयत्न करत आहे. मला नवीन लोकांना संधी द्यायची आहे. महाराष्ट्राच्या नेतृत्तवाची नवी फळी आम्ही तयार करतोय. तसेच ज्यांनी पक्षांतर केले त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. पक्षांतर केलेल्यांचा अनेक लोकांचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही आता नवीन लोकांना संधी देणार”, असं पवार म्हणाले.