‘शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी’, नारायण राणेंचा दावा

| Updated on: Jun 11, 2021 | 5:23 PM

शरद पवार बोलले असले तरी ते शिवसेनेबरोबर निवडणूक लढणार नाहीत. त्यांनी एकप्रकारे काँग्रेसला धमकी दिल्याचा दावा नारायण राणे यांनी केलाय.

शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी, नारायण राणेंचा दावा
शरद पवार आणि नारायण राणे
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अधिक जोमानं एकसोबत निवडणूक लढणार अशी घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी केलीय. यावेळी पवार यांनी शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच ठाकरे आणि मोदी भेटीवर बोलताना त्यावर किंचितही विचार करण्याची गरज नसल्याचं पवार म्हणाले. त्यावर आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी मोठा दावा केलाय. शरद पवार बोलले असले तरी ते शिवसेनेबरोबर निवडणूक लढणार नाहीत. त्यांनी एकप्रकारे काँग्रेसला धमकी दिल्याचा दावा राणे यांनी केलाय. (Sharad Pawar will not contest Election with ShivSena – Narayan Rane)

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो”, असं ट्वीट करत नारायण राणे यांनी पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केलंय. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसला एकप्रकारे सावधगिरीचा इशाराही दिलाय.

ठाकरे-मोदी भेटीवर पवार काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्वतंत्र बसून चर्चा केली असं सांगण्यात आलं. त्यांनी काहीही करो, पण लगेच वेगळ्या शंका, वावड्या काही लोकांकडून उठवल्या गेल्या. त्याच्यावर यत्किंचितही विचार करण्याची गरज नाही. हा पक्ष काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आता त्यात शिवसेनाही आली आहे. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.

‘महाविकास आघाडी पुढेही जोमानं एकत्र काम करेल’

ठाकरे-मोदी भेटीवर बोलताना पवारांनी महाविकास आघाडी एकसंध राहील असा दावा केलाय. पवार म्हणाले, “मघाशी मी सांगितलं की शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. पण हा महाराष्ट्र शिवसेनेला काम करताना गेली अनेक वर्षांपासून पाहतोय. माझं स्वत:चा यापूर्वीचा अनुभव एक विश्वास असावा असाच आहे. एक साधं उदाहरण सांगतो, ज्यावेळेला देशात जनता पक्षाची सत्ता आली. त्यावेळी सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असतानाही अशा स्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला. तो राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना फक्त पुढे आली नाही, तर त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की, या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना विजयी करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही”.

“तुम्ही विचार करा की, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि पक्षाचा नेता असा निर्णय घेतो की, आम्ही निवडणुकाच लढणार नाही. त्या नेत्याची स्थिती काय होईल. पण त्याची चिंता कधी बाळासाहेब ठाकरेंनी बाळगली नाही. त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला, हा इतिहास विसरता येत नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीने, ज्या कालखंडात ही ठाम भूमिका घेतली, ती भूमिका ते बदलतील असे आडाखे कुणी बांधत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहतात, एवढंच मी सांगेल. हे सरकार ५ वर्षे टिकेल, काम करेल. फक्त ५ वर्षे नाही तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्र काम करुन सामान्य जनतेचं प्रभावीपणे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असं भाकीतही पवारांनी यावेळी केलं आहे.

संबंधित बातम्या : 

Special Report : पुणे महापालिका निवडणूक; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, शिवसेनेची 80 जागांची मागणी, तर भाजपची जबाबदारी बापटांवर

आमदार संग्राम जगताप यांना अनिल देशमुखांच्या जागी मंत्री करा, नगरमध्ये ठराव

Sharad Pawar will not contest Election with ShivSena- Narayan Rane