राजकारणात काहीच कायम नसते, अहंकाराची माती होईलच, शिवसेना नेते संजय राऊतांचा हल्ला

| Updated on: Mar 13, 2022 | 9:03 AM

गोव्यासारख्या राज्यात कोणीही जिंकले तरी तो विजय खरा नसतो. राजकारणात काहीच कायमचे नसते. मग ते उत्तर प्रदेश असो, नाहीतर महाराष्ट्र. राष्ट्रीय नेता म्हणून नरेंद्र मोदी यांना आज पर्याय नाही. पण तो पर्याय शेवटी लोकच निर्माण करतील व अहंकाराची माती होईल!

राजकारणात काहीच कायम नसते, अहंकाराची माती होईलच, शिवसेना नेते संजय राऊतांचा हल्ला
संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: गोव्यासारख्या राज्यात कोणीही जिंकले तरी तो विजय खरा नसतो. राजकारणात काहीच कायमचे नसते. मग ते उत्तर प्रदेश असो, नाहीतर महाराष्ट्र. राष्ट्रीय नेता म्हणून नरेंद्र मोदी (narendra modi) यांना आज पर्याय नाही. पण तो पर्याय शेवटी लोकच निर्माण करतील व अहंकाराची माती होईल! पाच राज्यांतील निकालाने अहंकाराची पातळी वाढली. ती कमी झाली तरी पुरे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. पश्चिम बंगालात ममता व महाराष्ट्रात महाविकास आघाडी (mahavikas aghadi) राहणारच आहे. देशातील 29 पैकी फक्त 10 राज्यांतील विधानसभेतच भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. सिक्कीम, मिझोराम, तामीळनाडूमध्ये तर भाजपचे अस्तित्वच नाही. आंध्र, केरळ, पंजाब, बंगाल, तेलंगणात, दिल्लीत, ओडिशा आणि नागालँडमधील विधानसभेत भाजप किरकोळ स्वरूपात आहे. कारण या राज्यांत ‘हिजाब’सारख्या प्रकरणांना मतदार थारा देत नाहीत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून ही टीका केली आहे.

संसदीय लोकशाहीतून राजकीय विरोधक संपविणे हा देशाला सगळ्यात मोठा धोका आहे. देशाच्याच राजकारणातून विरोधी पक्ष साम, दाम, दंड, भेदाने संपवायचे व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करायचा हा भाजपचा आता एककलमी कार्यक्रम बनला आहे. 10 मार्चनंतर महाराष्ट्राचे सरकार पाडू, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस करतात व चंद्रकांत पाटील त्यास दुजोरा देतात. पश्चिम बंगालात व महाराष्ट्रातील राज्यपाल मनमानी पद्धतीने वागतात. मग निवडणुका आणि बहुमताचा अर्थ काय?, असा सवाल करतानाच पंजाबात ‘आप’ने विजय मिळविला. गोव्यात त्यांचा शिरकाव झाला. दिल्लीतून त्यांना हटविणे कठीण आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपला टोला

गोव्यात भाजपास 20 जागा मिळाल्या त्या फक्त इतरांनी केलेल्या मतविभागणीने. पणजीतून बाबूश मोन्सेरात व त्यांच्या पत्नी जेनिफर जिंकल्या. हे बाबूश महाशय जिंकल्यावर म्हणतात, ‘आमच्या विजयात भाजपचे काडीमात्र योगदान नाही. आम्ही आमच्या ताकदीवर जिंकलो.’ मुंबईत गोव्याचा विजय साजरा करणाऱयांनी बाबूश महाशयांचे हे उद्गार लक्षात ठेवले पाहिजेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

वारे विरोधात, तरीही मतदान

उत्तर प्रदेशातील वारे भाजपविरोधी वाहत होते. तरीही भाजपास मतदान झाले. कारण मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहतो व त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही. मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक मग बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे सर्व प्रश्न निवडणुकीपुरते विसरून जातात, असं त्यांनी म्हटलं आहे.

केजरीवाल उत्सववीर, मान पंजाब कसा सांभाळणार?

मोदींप्रमाणेच दुसरे उत्सववीर अरविंद केजरीवाल. ते स्वतःचे व पक्षाचे मार्केटिंग जोरात करतात. कालपर्यंत नास्तिक असलेले केजरीवाल निवडणुकीआधी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतात व आपण हनुमान भक्त असल्याचा प्रचार करतात. केजरीवाल यांच्या दिल्ली राज्यात त्यांनी चांगले काम केले. विजेपासून पाण्यापर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत सर्वच फुकट दिले. हीच फुकटेपणाची आश्वासने त्यांनी पंजाबच्या जनतेला दिली, पण पंजाबातला सगळ्यात मोठा प्रश्न शेवटी शेतकरी व कायदा-सुव्यवस्थेचा राहील. मुख्यमंत्री भगवंत मान तो कसा हाताळणार? पंजाबात आता काँग्रेस दुर्बल झाली व अकाली दल नगण्य ठरले. संवेदनशील सीमावर्ती राज्यातले हे चित्र बरे नाही, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला, ते काय शिवसेनेवर बोलतील?; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

डोंबिवली जवळील उंबार्ली टेकडीला वणवा, अग्निशमन विभागासह ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात

अमरावतीत काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या गाडीचा अपघात, पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, जखमींवर उपचार सुरू