‘मंत्रिमंडळ स्थापनेनंतर अनेक आमदार ‘मातोश्री’वर डोकं टेकवतील’, चंद्रकांत खैरेंचा दावा; बंडखोरांमध्ये वाद होणार असल्याचंही भाकीत

| Updated on: Jul 14, 2022 | 3:48 PM

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठा दावा केलाय. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अनेक आमदार मातोश्रीवर येऊन डोकं टेकवतील, असा दावा खैरे यांनी केला आहे.

मंत्रिमंडळ स्थापनेनंतर अनेक आमदार मातोश्रीवर डोकं टेकवतील, चंद्रकांत खैरेंचा दावा; बंडखोरांमध्ये वाद होणार असल्याचंही भाकीत
चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे
Image Credit source: Google
Follow us on

औरंगाबाद : 18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक पार पडल्यानंतर 19 जुलैला मंत्रिमंडळाची (Cabinet) स्थापना होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. दुसरीकडे शिवसेनेचे अनेक नेते अजूनही आशावादी असल्याचं पाहायला मिळतंय. काही आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे परततील असा दावा हे नेते करत आहेत. तर एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार दीपक केसरकर यांनीही शिवसेना-भाजप युतीबाबत सूचक वक्तव्य केलंय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठा दावा केलाय. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अनेक आमदार मातोश्रीवर येऊन डोकं टेकवतील, असा दावा खैरे यांनी केला आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, सध्या सुरु असलेलं शक्ति प्रदर्शन हे खोटं आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये वाद होणार आहेत. येणाऱ्या काळात त्यांना कळेल की इथे दिल्लीचा कंट्रोल आहे. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अनेक आमदार मातोश्रीवर येऊन डोकं टेकवतील, असा दावाच त्यांनी केलाय. तसंच खैरे यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधलाय. एनडीए सरकार आल्यापासून कुणाचीही कामं होत नाहीत. शिवसेनेचे सर्व खासदार उद्धव ठाकरे यांना पॉझिटिव्ह आहेत. इम्तियाज जलील हा अत्यंत नाटकी माणूस आहे. तो हिंदू मुस्लिम वाद लावण्यासाठी नाटकं करतो, असा आरोपही खैरे यांनी जलील यांच्यावर केलाय.

भाजप-शिवसेना युतीचं घोडं एका फोनवर अडलंय?

भाजप-शिवसेना युतीबाबत शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी खळबळजनक दावा केलाय. भाजप-शिवसेना युतीचं मानापमान नाट्य सुरु आहे. कुणी पुढाकार घ्यायचा यावर सगळं अडलं आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ मानलं आहे. मोदींनी 370 हटवून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलंय. राम मंदिर हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते ही मोदींनी पूर्ण केलंय. आता फक्त फोन कुणी करायचा? यावर अडलं असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय.

‘शरद पवार यांनी चार वेळा शिवसेना फोडली’

केसरकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवार यांनी चार वेळा शिवसेना फोडली. छगन भुजबळ, राज ठाकरेंच्या वेळी पवारांनी शिवसेना फोडली असा गंभीर आरोप केसरकर यांनी केलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चॉईस एकनाथ शिंदे हेच होते. उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी नाईलाजास्तव करावी लागली होती, असंही केसरकर यांनी म्हटलंय.