Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांवरच अपात्रतेची टांगती तलवार, त्यांची शपथही बेकायदेशीर, ते काय कार्यकारिणी बरखास्त करणार?; राऊतांनी फटकारलं

| Updated on: Jul 18, 2022 | 7:12 PM

मुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथच बेकायदेशीर आहे. शिवसेनेचे खासदार फुटीर गटाबरोबर बैठका घेत असतील तर कारवाई केली जाईल. त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कोणताही आधार नाही.

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांवरच अपात्रतेची टांगती तलवार, त्यांची शपथही बेकायदेशीर, ते काय कार्यकारिणी बरखास्त करणार?; राऊतांनी फटकारलं
संजय राऊत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : आम्ही मुख्यप्रतोद पदी राजन विचारे (Rajan Vichare) यांची नेमणूक कायद्याच्या आधारे केली आहे. तेच मुख्य प्रतोद राहतील. स्वतः मुख्यमंत्र्याच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अपात्रतेसाठी जी 16 नाव दिली त्यात मुख्यमंत्र्यांचं नाव पहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथच बेकायदेशीर आहे. शिवसेनेचे खासदार फुटीर गटाबरोबर बैठका घेत असतील तर कारवाई केली जाईल. त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कोणताही आधार नाही. एक फुटीर गट मूळ पक्षाची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो. त्यांना अधिकारच नाही. असा सवाल उपस्थित करत संजय राऊतां (Sanjay Raut)नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फटकारले आहे.

कॉमेडी एक्सप्रेसचा सीजन टू सुरूंय

मुख्यमंत्री येतील. त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी येतील. पण या देशातील न्याय मेला नाही याची मला खात्री आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय होईल. कलाबेन डेलकर बाहेर आहेत. अजून काही बाहेर आहेत. किर्तीकर आजारी आहेत. तुम्ही आकडे मोजा. ते जे आकडे देत आहेत. ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी देत आहे. ही फसवाफसवी सुरू आहेत. आता कॉमेडी एक्सप्रेसचा सीजन टू सुरू आहे. लोक मजा घेत आहे. फुटून गेलेले लोक बाहेर आहेत. तुम्ही म्हणता आमची शिवसेना. कोणत्या आधारे म्हणता. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ती शिवसेना भवनातून सुरू राहील. तुम्ही तुमचा खुशाल वेगळा संसार मांडा, असे संजय राऊत म्हणाले.

लोकं मालक बदलतात तसे यांनी मालक बदललाय

मुख्यमंत्र्यांना दिल्लीत का यावं लागतं. आमचं हायकमांड दिल्लीत नाही, मुंबईत आहे. भाजपसोबत सत्ता होती तेव्हाही आमचं हायकमांड मुंबईतच होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री कधीच दिल्लीत आला नाही. लोक नोकऱ्या बदलतात, मालक बदलतात. तसं यांनी मालक बदलला आहे. शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताडावर आहे. आम्ही हळूहळू घेत आहे. अजूनही आम्ही फार सौम्यपणे घेत आहोत. कायदेशीर लढाईतच आमचा वेळ जातोय. उद्धव ठाकरे लवकरच बाहेर पडतील. महाराष्ट्राबाहेरील राज्यांचा दौरा करतील. त्यानंतर एक तुफान निर्माण होईल, त्या तुफानापुढे कोणीही टिकणार नाही, असे राऊतांनी सांगितले. (Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Chief Minister Eknath Shinde)

हे सुद्धा वाचा