ठाकरे-फडणवीसांची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत? संजय राऊत म्हणतात…

| Updated on: Mar 23, 2023 | 5:26 PM

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट झाल्याची माहिती समोर आलीय. या भेटीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या भेटीनंतर आता संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठाकरे-फडणवीसांची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत? संजय राऊत म्हणतात...
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) कधी काय होईल, याचा कधीच अंदाज बांधता येणार नाही. राज्यात नऊ महिन्यांपूर्वी सत्तांतर घडून आलं. या घडामोडींनंतर शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण अक्षरश: ढवळून निघालं. या सगळ्या घडामोडींदरम्यान आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी आणि आश्चर्यकारक घटना घडली. कारण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज अनेक महिन्यांनी भेट झाली. आता या भेटीवर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आलीय.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. या भेटीत भाजप आणि ठाकरे गटाची आगामी काळातील काही राजकीय रणनीती ठरली की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. या दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय.

‘कटुता संपवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत’

“याचा अर्थ असा आहे की, उद्धव ठाकरेंनी वारंवार विधानसभेत जायला हवं. म्हणजे एकत्र भेटतील, बोलतील, चर्चा करतील. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. विरोध राजकीय असतो, व्यक्तीगत नसतो. मी मागेही म्हणालो, कटुता संपवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. निवडणुकीत तुमचा पराभव करु. विचारांची लढाई विचारांनी करु. पण सुडाने, बदल्याच्या भावनेने कारवाई करणार असाल आणि तशी भाषा करणार असाल तर मग आम्हाला तशाच भाषेत उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्र हे एक संस्कारी राजकारण करणारं राज्य आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

ठाकरे-फडणवीस यांनी भेटून का बोलू नये?

“उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेटून का बोलू नये? त्यांच्या भेटीमागे काही राजकीय संकेत आहेत, असं मला वाटत नाही. मी एवढा भोळा आशावादी नाही. ज्या पद्धतीचं राजकारण आमच्यासोबत गेल्या काही महिन्यात घडलं. ज्या जखमा आहेत त्या कधी भरुन काढता येणार नाहीत”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

“ईव्हीएमचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. या देशाच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं हे ईव्हीएम प्रकरण आहे. निवडणुका होतात पण या निवडणुकांच्या निकालावर जनतेचा विश्वास नाही. त्याला कारण ईव्हीएम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही प्रश्न असतील काही प्रमुख नेते असतील त्यांना एकत्र बोलवून चर्चा घडवली असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.

“हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरु असल्याचं बोललं जातं. पण आम्ही त्या चढाओढीत नाहीत. तुम्ही शंभर नावं घ्या. आम्ही त्यामध्ये नाहीत. माझे नेते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा मार्ग त्यामार्गाने आम्ही जातोय”, असंदेखील संजय राऊत यावेळी म्हणाले.