‘पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी दानवेंच्या वक्तव्याची गंभीर दखल घ्यावी; चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा’

| Updated on: Dec 10, 2020 | 11:07 AM

केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या दानवे यांनी हे वक्तव्य केले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी सबळ पुरावे असणारच. | Sanjay Raut

पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी दानवेंच्या वक्तव्याची गंभीर दखल घ्यावी; चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा
Follow us on

मुंबई: दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शैलीत समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. आपण चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. (Shivsena MP Sanjay Raut slams Raosaheb Danve )

संजय राऊत गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह करणाऱ्या रावसाहेब दानवे यांना शाब्दिक चिमटे काढले. शेतकरी आंदोलनापाठी चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा गंभीर मुद्दा रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या दानवे यांनी हे वक्तव्य केले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी सबळ पुरावे असणारच.

यावर केंद्रीय मंत्रिमंडळातही चर्चा झाली असेल. त्यामुळे लडाखमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीकडे तुर्तास दुर्लक्ष करा. पण सिंघू बॉर्डरपर्यंत आतमध्ये शिरलेल्या चीनला सर्वप्रथम रोखले पाहिजे. दानवेंचे वक्तव्य प्रमाण मानून आपण भारतात अराजक आणि अशांती माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनवर आपण हल्ला केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘केंद्र सरकारने कृषी कायदे प्रथम भाजपशासित राज्यांमध्ये लागू करावेत’

केंद्र सरकारने कृषी कायद्यांची अंमलबजावणी प्रथम भाजपशासित राज्यांमध्ये करावी. त्यानंतर या कायद्यांचा काय परिणाम होतो हे पाहून पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारला तोडगा काढणे शक्य होते. मात्र, केंद्र सरकारला हा विषय अधांतरी ठेवण्यातच रस आहे. बिहारमध्ये कृषी कायद्यासारख्या सुधारणा झाल्या होत्या. माझ्या माहितीप्रमाणे सध्या बिहारमध्ये धान्याचा भाव 900 रुपये इतका आहे, तर पंजाबमध्ये हाच भाव 1500 रुपये इतका आहे. मग आता बिहारमधील शेतकऱ्यांनी धान्य विकण्यासाठी पंजाबमध्ये जावे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

दानवे काय म्हणाले होते?

राजधानी दिल्लीत गेल्या 13 दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते या आंदोलनावर टीका करताना दिसत आहे. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे.

‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल दानवेंनी यावेळा केला.

संबंधित बातम्या: 

दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल; बच्चू कडू यांची घणाघाती टीका

कृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

(Shivsena MP Sanjay Raut slams Raosaheb Danve )