महापुराचे संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात कसा येतो? उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

| Updated on: Aug 11, 2019 | 3:31 PM

"राज्यात भीषण महापुराचे संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात कसा येतो," असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray)  यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांना लगावला.

महापुराचे संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात कसा येतो? उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
Follow us on

मुंबई : “राज्यात भीषण महापुराचे संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात कसा येतो,” असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray)  यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांना लगावला. शनिवारी शिवसेनेने पूरग्रस्तांना (kolhapur sangli floods) अन्नधान्यासह वैद्यकीय मदत पाठवली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “राज्यात भीषण पूरस्थिती आहे. त्यातून सावरण्यासाठी लोकांना वेळ लागेल. त्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकला किंवा पुढच्या वर्षी घ्या”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती.

“राज्यात एकूणच परिस्थिती गंभीर आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोण कमी पडतंय याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण पूरग्रस्त बांधवांसाठी पूर्ण ताकदीनिशी उभे राहायला हवे”, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेनेच्या वतीने दुपारी पूरग्रस्तांना शिवसाहित्य मदतीचे ट्रक पाठवण्यात आले. यात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, औषधे, खाण्याचे साहित्य अशा विविध वस्तू शिवसेनेतर्फे कोल्हापूर, सांगलीत पाठवण्यात आल्या. याबाबतची माहिती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले.

मी गेल्या तीन चार दिवसांपासून स्थानिक शिवसैनिकांच्या संपर्कात आहे. त्या ठिकाणी लोकांना पाण्याबाहेर काढणं अधिक महत्त्वाचे आहे. काही गावांमध्ये पुराचे पाणी ओसरले असले, तरी काही ठिकाणी अद्याप पाणी आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे तिथे पुरवणं गरजेचं आहे. त्यानुसार आम्ही गरजेच्या वस्तू पोहोचवत आहोत. असे उद्धव ठाकरे म्हणाले

“पूर ओसरल्यानंतर जी परिस्थिती ओढवणार आहे त्यामुळे काही प्रमाणात आजार रोगराई पसरु शकते. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून औषधही शिवसाहित्यात पाठवण्यात येत आहेत. तसेच 100 डॉक्टरांची टीमही या ठिकाणी पावण्यात येणार आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरेंना पुरासंदर्भात होत असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता ते म्हणाले “आता याबाबत बोलण्याची वेळ नाही. मला राजकारणात पडायचे नाही. पूरग्रस्तांसाठी जे काही आवश्यक आहे ते करणे मला महत्त्वाचे वाटते. ज्यांची घरं वाहून गेली त्यांना मदत करणं महत्त्वाचे आहे.” जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फीप्रकरणी उद्धव ठाकरेंना विचारले असता, “कोण काय करतंय मला माहित नाही. आम्ही आणि आमचे लोक काम करतात” असे ते म्हणाले.

‘वातावरण बदल होतोय. मुंबईतही महिनाभराचा पाऊस एका दिवसात पडला. याविषयीचा विचार, त्यावर मात करणारी यंत्रणा निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांनी विचार करायला हवा,’ असं मतही उद्धव यांनी व्यक्त केलं.