…तर दलित समाज रस्त्यावर उतरेल, शिवसेनेचा इशारा

| Updated on: Oct 06, 2020 | 7:51 AM

योगींचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही हेच त्यांनी सिद्ध केले," असा टोलाही शिवसेनेनं लगावला.  (Shivsena Criticizes BJP on Hathras gang rape)

...तर दलित समाज रस्त्यावर उतरेल, शिवसेनेचा इशारा
Follow us on

मुंबई : “मुंबईतील एका नटीस केंद्र सरकार वाय प्लस सुरक्षा देते, पण हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबास ‘भगवान भरोसे’ सोडले जाते हे काही समान न्यायाचे तत्त्व नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेला साजेसा हा न्याय नाही. याप्रकरणी अन्यायाचा स्फोट झाला तर दलित समाज संतापून रस्त्यावर उतरेल याचे भान ठेवले पाहिजे,” असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. (Shivsena Criticizes BJP on Hathras gang rape)

“स्वसंरक्षणार्थ दलितांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावाच, पण शस्त्रखरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळावे अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आता केली. ही पहिली ठिणगी आहे. त्या ठिणगीत तेल ओतण्याचे काम तरी सरकारने करू नये. सरकारने पहिल्या दिवसापासून लपवाछपवी केली नसती तर वातावरण इतके चिघळले नसते. आता बोलून काय?” असा सवालही शिवसेनेनं सामनाच्या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

“हाथरस बलात्कारप्रकरणी योगी सरकारचे पाय रोज खोलातच जात आहेत. पोलिसी बळाचा वापर करून पीडित मुलीच्या कुटुंबाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीचा मृतदेह रात्रीच पोलिसांच्या मदतीने जाळून टाकला. त्या मुलीच्या घरी कुटुंबास भेटण्यासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांवर लाठय़ा चालवल्या. पण जनमताचा रेटा पुढेच सरकू लागला, तेव्हा योगी सरकारने या सर्व प्रकरणी हाथरस पोलिसांचा बळी देऊन काखा वर केल्या. आता हाथरसचा तपास सीबीआयकडे सोपवून मोकळे झाले.  सर्व प्रकरणात सीबीआय नक्की काय करणार ते त्यांनाच माहीत. योगींचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही हेच त्यांनी सिद्ध केले,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला.

“मुंबईत सुशांत प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक पोहोचले, पण पन्नास दिवस उलटून गेले तरी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाचे पुढचे पानही त्यांना उलटता आले नाही. सीबीआय हाथरसला जाणार असेल तर ठीक, पण जाऊन करणार काय? त्या पीडित मुलीलाच सरकारने जाळून राख केले आणि पुरावे मातीत मिसळले. हे सर्व हाथरसच्या पोलिसांनी ‘वर’ विचारल्याशिवाय केले काय? सगळे काही संगनमतानेच झाले आहे,” अशी टीकाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हाथरसच्या निमित्ताने ढोंगी बाया आणि बुवांचे बुरखे फाटले

“हाथरसप्रकरणी जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या समर्थनार्थ हाथरसच्या आसपास मेळावे घेतले जातात. त्या मेळाव्यांचे नेतृत्व भाजपचे पुढारी करतात असे प्रसिद्ध झाले आहे. तसे काही खरोखरच घडले असेल तर ते कृत्य लाजिरवाणे आणि किळसवाणेच आहे. अशा किळसवाण्या मेळाव्यांत मुंबईत अन्याय, अत्याचार वगैरेंविरुद्ध लढणाऱ्या नट्यांनी घुसून जाब विचारायला हवा. मुंबईत एक भूमिका आणि उत्तर प्रदेशात वेगळी भूमिका हे बरोबर नाही. पण हाथरसच्या निमित्ताने अनेक ढोंगी बुवा व ढोंगी बायांचे मुखवटे गळून पडले आहेत. सुशांतप्रकरणी जे लोक महाराष्ट्राला बदनाम करायला गेले ते स्वतःच हाथरसच्या खड्डय़ात पडले,” असा घणाघातही शिवसेनेनं केला.

“मुख्यमंत्री योगी यांना ‘हाथरस’प्रकरणी घेरण्याचे कारस्थान त्यांच्याच पक्षात चालू आहे काय? तसे काही घडत असेल तर ते बरोबर नाही. हाथरस प्रकरणाचे राजकारण करू नये. त्या पीडित मुलीस व तिच्या कुटुंबास न्याय मिळावा. तिच्या कुटुंबास जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. संपूर्ण कुटुंब दहशतीखाली जगत आहे. अशा वेळी त्या पीडित मुलीच्या कुटुंबास ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी झाली तर काय चुकले? कथुआपासून उन्नाव आणि हाथरसपर्यंत हेच घडत आले आहे. प्रत्येक प्रकरणात आरोपींना पाठिंबा देण्याची दडपशाही केली गेली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांची डोकी फोडायची ही कसली लोकशाही?” असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे. (Shivsena Criticizes BJP on Hathras gang rape)

संबंधित बातम्या : 

सुशांतप्रकरणी CBI चौकशीत काय झाले?, खोदा पहाड, निकला चुहा, गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये : रामदास आठवले