कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीबाबा म्हणाले, हे सरकार आमचं नाही, आता एकनाथ शिंदे म्हणतात…

| Updated on: May 25, 2020 | 3:32 PM

पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत. ते मुख्यमंत्र्यांशी कधीही बोलू शकतात, काही अडचणी सांगू शकतात, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. (Eknath Shinde on Prithviraj Chavan Audio Clip on Thackeray Government)

कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीबाबा म्हणाले, हे सरकार आमचं नाही, आता एकनाथ शिंदे म्हणतात...
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असले तरी सरकार हे महाविकास आघाडीचं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांशी आवश्यक तेव्हा संवाद साधावा, असा सल्ला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्या मनात ठाकरे सरकारवरील खदखद व्यक्त होत असल्याची चर्चा आहे, त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. (Eknath Shinde on Prithviraj Chavan Audio Clip on Thackeray Government)

“मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असले, तरी सरकार हे महाविकास आघाडीचं आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा होत असतात. पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत. ते मुख्यमंत्र्यांशी कधीही बोलू शकतात, काही अडचणी सांगू शकतात, पृथ्वीराज चव्हाणांनीही मुख्यमंत्र्यांशी आवश्यक तेव्हा संवाद साधावा, ते महत्त्वाचे नेते आहेत” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : राज्यात आमचे नाही, शिवसेनेचे सरकार, कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची खदखद?

“मी मंत्रीमंडळात नाही. पण शिफारस करेन. आमचं सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन. पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे होईल असा वाटत नाही. निधी सगळा परत घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये निधी सगळा परत घेतला आहे” असे पृथ्वीराज चव्हाण यांचे समोरच्या व्यक्तीला सांगणे होते. “तुमचं नाव मोठं आहे, तुम्हाला भविष्यात संधी आहे” असं कार्यकर्ता म्हणाला असता “जेव्हा होती संधी, तेव्हा दिली नाही” अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी खदखद व्यक्त केल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतं.

पृथ्वीराज चव्हाण आणि एका व्यक्तीमधील दूरध्वनीवरील संवाद यामध्ये ऐकू येतो. स्थानिक भागासाठी निधीच्या अपेक्षेने त्या व्यक्तीने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता.

राज्यातील नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव असल्याचे आढळते, असे कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अलीकडेच पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आपल्या बोलण्यातून चुकीचा अर्थ काढला गेल्याचा दावाही त्यांनी केला होता.

एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

-सध्याची वेळ राजकारणाची नाही, विरोधकांनी आम्हाला आवश्यक त्या सूचना कराव्या, या कठीण काळात सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक

-कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी राज्य सरकार शक्य ती सर्व पावलं उचलत आहे, केंद्राच्या आधी लॉकडाऊन महाराष्ट्र सरकारने जाहीर केला

-जर उपाययोजना केल्या नसत्या, तर मुंबईचा आकडा आणखी वाढला असता, उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले

-मजूर पायी जाताना विदारक चित्र देशाने पाहिले, राज्य सरकारने सीमेपर्यंत पाठवण्याचं काम केलं, रेल्वेचा खर्चही दिला, जे जे मजूर होते, त्यांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण दिलं, कोणीही उपाशी राहता कामा नये हे पाहिलं

– महाराष्ट्रातून बाहेर गेलेल मजूर म्हणतायेत तिकडे आम्हाला जेवण-पाणी मिळालं, इथे हाल होत आहेत, यावरुनच महाराष्ट्राने किती दक्षता घेतली लक्षात येईल

-कोरोनाशी लढताना राजकारण बाजूला ठेवा, लॉकडाऊन वाढवला हे लोकांसाठीच आहे, कटू निर्णय घ्यावे लागतात, संकट मोठं आहे, तारेवरची कसरत आहे, अशा काळात आरोप-प्रत्यारोप टाळायला हवेत

-सर्व सुरळीत होतंय असं मी म्हणणार नाही, पण जिथे कमतरता असेल ते दाखवून द्या, दुरुस्त करु पण प्रत्येकाचा जीव वाचवणे आवश्यक आहे

-कोरोना टेस्ट या महाराष्ट्रात सर्वाधिक, कोरोनाच्या टेस्ट जास्त केल्यामुळे संख्या वाढत आहे, जो पॉझिटिव्ह सापडतो त्याच्यावर उपचार करतो आहे, फिव्हर क्लिनीकही मोठ्या प्रमाणात सुरु केले आहेत

– कुठल्याही रुग्णाला बेड मिळाला नाही अशी परिस्थिती होणार नाही याची खबरदारी घेतली आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात आवश्यक ती उपाययोजना

-रुग्णांची संख्या वाढत आहे, पण डिस्चार्जचं प्रमाणही वाढवण्याचं आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्याचं आमचं ध्येय आहे

संबंधित बातम्या :

माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही : पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, टीका नाही : पृथ्वीराज चव्हाण