आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न, सामनातून विरोधकांवर गंभीर आरोप

| Updated on: Sep 05, 2020 | 9:28 AM

शिवसेनेचे मुखपत्र सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात विरोधकांवर आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे (Saamana editorial on corona death of Pandurang Raykar).

आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न, सामनातून विरोधकांवर गंभीर आरोप
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात विरोधकांवर आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे (Saamana editorial on corona death of Pandurang Raykar). टीव्ही 9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर आणि पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाचा बळी ठरल्याचं सांगत सामनात याविषयी देखील नाराजी व्यक्त करण्यात आली.

अग्रलेखात म्हटलं आहे, “पुण्यात टीव्ही 9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर या तरुण पत्रकाराला वेळीच रुग्णवाहिका न मिळाल्याने दिरंगाईत प्राण गमवावा लागला. रायकर यांच्या मृत्यूने पत्रकारांमध्ये चीड आणि संताप निर्माण होणं साहजिक आहे. इतक्या ओळखीपाळखी असतानाही पत्रकार आपल्या सहकाऱ्यास वेळेवर मदत करु शकले नाहीत, तेथे इतर सामान्य जणांची काय पत्रास असे बोलले जात आहे आणि या भावना समजून घेतल्या पाहिजेत.”

“पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे हेही कोरोनाग्रस्त होते. त्यांच्या उपचारासाठी पुण्यात खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ शकला नाही. ससून रुग्णालयात तरी उपचार करावा यासाठी खासदार गिरीश बापट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करावे लागले. पण काहीच उपयोग झाला नाही. दत्ता एकबोटे हे कष्टकरी, गोरगरीबांसाठी काम करणारे नेते होते. आतापर्यंत त्यांनी असंख्या गोरगरीबांना उपचारासाठी मदत केली असेल, पण एकबोटे यांना शेवटच्या क्षणी उपचार मिळाले नाहीत.”

“विरोधकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न”

या अग्रलेखात विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली. तसेच कोरोना काळात पुरेशा आरोग्य व्यवस्था नसण्याला फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. अग्रलेखात म्हटलं आहे, “वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी भरती आणि सुविधा योग्य निर्माण केल्या असत्या तर आजची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आली असती. मागच्या 5 वर्षात फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज तात्पुरत्या जम्बो सुविधा उभारण्याची गरज कमी लागली असती.”

“विरोधी पक्षांच्या टीकेचा आरोपांचा मुख्य भर जम्बो कोव्हिड केंद्रावर आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही,” असंही यात नमूद करण्यात आलं.

हेही वाचा :

पुण्यात कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमींच्या संख्येत वाढ, माजी महापौरांच्या निधनानंतर प्रशासनाला जाग

पांडुरंगनंतर पुण्याचे माजी महापौरही व्यवस्थेचे बळी, आधी बेड नाही, मग अंत्यसंस्कारांसाठी वणवण

Special Report | पांडुरंग रायकरांसोबत नेमकं काय झालं?

Saamana editorial on corona death of Pandurang Raykar